बाभूळगाव जहाँ. : अकोला तालुक्यातील ९६ हजार हेक्टरवरील पिकांवर रोगराई पसरल्यामुळे बळीराज संकटात सापडला असून, मोठय़ा प्रमाणात उत्पन्नात घट येण्याची चिन्हे दिसत आहेत. कपाशी व सोयाबीन या मुख्य पिकांवर हा आजार आल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील शेतकर्यांनी सोयाबीन व पर्हाटीची जास्त प्रमाणात पेरणी केली आहे; परंतु कपाशीवर कोकडा तर सोयाबीन पिवळे पडत असल्यामुळे हाताशी आलेले पीक जाते की काय, या भीतीने शेतकर्यांची झोप उडाली आहे. जिल्ह्यातील बहुतांश पिकांची स्थिती चांगली आहे. उडीद आणि मूग पीक शेतकर्यांच्या हातून आधीच गेलेले आहे. शेतकर्यांचे आर्थिक बजेट हे कपाशी, तूर आणि सोयाबीनवर अवलंबून होते. शेतकर्यांनी दुबार पेरणी केल्यामुळे परिसरात मोठय़ा प्रमाणात शेतकरी आजही कर्जाच्या ओझ्याखाली आहेत; परंतु कोकडा व सोयाबीन पिवळे पडत असल्याने या पिकांच्या उत्पन्नात घट येणार आहे. अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू, वाशिंबा, बाभूळगाव, डोंगरगाव, मासा, शिसा, बोंदरखेड, अन्वी मिर्झापूर, आपातापा, म्हैसांग या परिसरातील पिके या रोगराईच्या विळख्यात सापडली आहेत. विविध पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. आधीच सोयाबीनची उगवणक्षमता कमी असल्यामुळे शेतकरी चिंतेत असताना या नव्या रोगराईच्या संकटामुळे शेतकरी खचून गेला आहे. शेतकर्यांचे नुकसान झाल्यानंतर शासन स्तरावर मदतीची घोषणा करण्यात येते; परंतु ही मदत तुटपुंजी असल्यामुळे शेतकर्यांना या मदतीचा कधीच फायदा होत नाही. कृषी विभागाच्यावतीने शेतकर्यांसाठी मार्गदर्शन कक्ष सुरू करावे व गावागावांत शेतकर्यांना मार्गदर्शन केल्यास काही प्रमाणात पिकांचा बचाव होऊ शकतो, असे मत येथील शेतकरी व्यक्त करीत आहेत.
सोयाबीन, कपाशी धोक्यात
By admin | Updated: September 1, 2014 21:37 IST