वणीरंभापूर: येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून ७ लाख रुपये गोळा करीत, तसेच श्रमदानातून हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार केला. वणीरंभापूर येथील हनुमान मंदिर शिकस्त झाले होते. या मंदिराच्या जीर्ण अवस्थेकडे शासन, लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष झाल्यामुळे ग्रामस्थांनी लोकवर्गर्णीतून मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे ठरविले आणि ७ लाख रुपये गोळा करून श्रमदानासह मंदिराचे बांधकाम केले. या मंदिरावर २२ जून पासून भागवत सप्ताहास प्रारंभ झाला असून, २९ जून रोजी मंदिरात हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कळस स्थापना करण्यात येणार आहे. भागवत सप्ताहात हभप गोपाल महाराज खंडारे यांच्या सुमधूर वाणीतून भागवत कथा सादर करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला गावातील महिला, पुरुष, मुले मोठ्या प्रमाणात उत्साहाने सहभागी होत असल्यामुळे गावात भक्तीमय वातावरण तयार झाले आहे.
लोकवर्गणीतून हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार
By admin | Updated: June 27, 2014 21:47 IST