विवेक चांदूरकर /अकोला: पाऊस, पाऊस अन पाऊस.. सध्या शेतकरी, मजूर, छोट्या-छोट्या दुकानदारांपासून तर मोठय़ा व्यावसायिकांपर्यंंत सर्वांंना आता केवळ पावसाचीच वाट असून, डोळे आकाशाकडे लागले आहेत. एक महिन्यापासून पावसाने दांडी मारल्यामुळे शेती व्यवसाय तर ठप्प झालाच आहे. मात्र याचा परिणाम सर्वच बाजारपेठेवर पडला असून, सराफा, कापड यासह अन्य व्यवसायातही मंदीचे सावट पसरले आहे. केवळ शेतकरीच नाही तर व्यावसायिकही आता चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहेत. कृषी बाजारपेठेत चक्क व्यावसायिकांचे ५0 टक्के किंवा त्यापेक्षाही जास्त नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एक महिन्यापासून पावसाचा थेंबही पडला नाही. त्यामुळे शेती व्यवसाय पूर्णत: कोलमडून पडला आहे. जिल्ह्यातील ७0 टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष शेती व्यवसायावरच अवलंबून आहे. त्यामुळे जिल्ह्याची अर्थव्यवस्थाच शेतीवर अवलंबून आहे. पाऊस येत नसल्यामुळे ग्रामीण भागात मरगळ पसरली आहे. शेतकरी, मजूर व गावागावांमधील व्यावसायिकही अडचणीत आले आहेत. शेतकर्यांची पुंजी शेतात लागली आहे. त्यामुळे चांगल्या उत्पादनासाठी व होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांना पाऊस हवा आहे. त्यासोबतच व्यावसायिकही पावसाची वाट पाहत आहेत. गतवर्षी शेतकर्यांनी उडीद, मुगासह तूर व सोयाबीनच्या बियाण्यांची खरेदी केली होती. मात्र, पाऊस तब्बल दोन महिने उशिरा आल्यामुळे उडीद व मुगाची पेरणी शेतकरी करून शकले नाहीत. परिणाम शेतकर्यांना नुकसान सहन करावे लागले. या अनुभवातून शहाणे होत, शेतकर्यांनी यावर्षी पाऊस आल्यानंतरच बियाण्यांची खरेदी केली. जिल्ह्यात यावर्षी पाऊस केवळ ७ ते १७ जूनपर्यंंतच झाला. त्यानंतर पावसाने दांडी दिली. १0 जुलैपर्यंंत जिल्ह्यात ६५ टक्के पेरणी झाली असून, ४५ टक्के पेरणी व्हायची आहे. पाऊसच नसल्यामुळे शेतकरी बियाणे व खत खरेदीच करीत नाही आहे. यामुळे कृषी बाजारपेठेवर मरगळ पसरली असून, ज्या व्यावसायिकांनी बियाणे व खताची खरेदी केली, त्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे.
पावसाची दांडी; बाजारपेठेत मरगळ
By admin | Updated: July 14, 2015 02:23 IST