निहिदा: गत तीन वर्षांपासून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पिंजर-निहीदा रस्त्याचे काम सुरू झाले; मात्र अवघ्या काही दिवसातच रस्त्यावरील डांबरीकरण उखडल्याने कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे नागरिकांना नाहक त्रासाला समारे जावे लागत आहे. रस्त्याच्या कामाबाबत निहिदा, बहिरखेड, लखमापूर येथील ग्रामस्थांनी तक्रारी करूनही परिस्थिती जैसे थे असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पिंजर-निहिदा रस्त्याचे काम सुरू झाले असून, अद्यापही अपूर्णच आहे. रस्त्याचे झालेले काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने परिसरातील निहिदा, बहिरखेड, लखमापुर येथील ग्रामस्थांनी तक्रारी केल्या; मात्र कंत्राटदाराविरुद्ध कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. निकृष्ट काम होत असल्याने परिसरातील रस्त्याचे काम बंद पाडले असून, कंत्राटदाराने काम अपूर्ण करून साहित्य नेल्याचे चित्र आहे. रस्त्याच्या कामाबाबात कंत्राटदार राहुल सावजी यांना विचारणा केली असता ते अपमानास्पद वागणूक देऊन उडवाउडवीची उत्तरे देतात, असा आरोप नागरिकांनी केला आहे. काम केल्यानंतर काही दिवसातच निहिदा-सावरखेड फाट्यापर्यंत उखडले आहे. गत काही दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या अनुराधा ठाकरे यांनी तक्रार देऊन विरोध केला होता. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन त्वरित दर्जेदार काम करण्याची मागणी निहिदाचे सरपंच मीना अविनाश ठाकरे, बहिरखेडचे सरपंच कविता किरण ठाकरे, पोलीस पाटील विजय ठाकरे, किरण ठाकरे, संतोष सोनटक्के, मनोज सोनटक्के यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
-----------------------
निहिदा- पिंजर रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून, याबाबत लवकरच कारवाई करण्यात येईल.
-नितीन नाकट, कार्यकारी अभियंता, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अकोला
डांबरीकरणाचे निकृष्ट झाल्याचे आरोप होत होते, त्यामुळे सद्या काम बंद आहे. आधी रिपेरिंगचे काम होईल, नंतर डांबरीकरण होईल.
- राहुल सावजी, कंत्राटदार अकोला
निहिदा- पिंजर रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याच्या अनेक तक्रारी दिल्या; मात्र चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे डांबरीकरणाचे काम बंद पाडले आहे.
-मीना अविनाश ठाकरे, सरपंच निहिदा