पिंजर(अकोला): येथून वडगावकडे जाणार्या मार्गावरील पिंजर्डा नदीवर असलेल्या पुलाचे आयुष्य संपले तरीही पुलाच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला जाग येत नसल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. पिंजर्डा नदीवर ३५ फूट उंच असलेल्या या पुलावर अनेकदा अपघात घडले आहेत. पिंजर ते वडगाव या ३ किमीच्या रस्त्यावर पिंजर्डा नदीपात्रात हा पूल अनेक वर्षांपूर्वी बांधलेला आहे. या पुलावरून दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते. परिसरातील पार्डी, मोझरी, निंबी, वडगाव, निंबी बु., निंबी खुर्द, टाकळी छबीले, मोरगाव काकड येथील अनेक लोक या पुलावरून ये-जा करतात. आजमितीस हा पूल जीर्ण झाला असून, त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून अनेकदा करण्यात आली; परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. या पुलाशिवाय दुसरा मार्ग नसल्यामुळे या भागातील लोकांना नाईलाजाने जीर्ण झालेल्या पुलावरून जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागते. या पुलाच्या दुरुस्तीमध्ये राजकारण आड येत असल्याची चर्चा आहे. पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून, लोखंडी सळयादेखील बाहेर आल्या आहेत. त्यामुळे हा पूल धोकादायक बनला आहे. संबंधित विभागाने या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
पिंजर्डा नदीवरील पूल बनला धोकादायक
By admin | Updated: May 17, 2014 19:24 IST