अकोला : विषमुक्त आणि शाश्वत शेतीसाठी सेंद्रीय शेतीला पर्याय नसून, भविष्यात सेंद्रीय शेतीच फायदेशीर ठरणार आहे. परंतु सेंद्रीय शेतमाल उत्पादनाला पूरक भाव मिळणे गरजेचे आह, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दिलीप मानकर यांनी केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कमेटी सभागृहात रविवारी सेंद्रीय शेतकरी आणि उद्योजक या विषयावर आयोजित विदर्भस्तरीय परिसंवादात डॉ. मानकर बोलत होते. व्यासपिठावर कुलसचिव ज्ञानेश्वर भारती,शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले,अधिष्ठाता डॉ. व्ही.एम. भाले, एसएओ प्रमोद लहाळे, उद्योजक मनोहर भोजवाणी,महिला शेतकरी उद्योजक सरला पाटील,निखील भोजवाणी आदींची प्रमुख उपस्थिती होती.डॉ.मानकर यांनी यावेळी शेतकर्यांनी उत्पादीत केलेल्या मालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध व्हावी हे कृषी विद्यापीठाचे प्रयत्न असल्याचे सांगितले. डॉ. भाले यांनी शेतकरी आणि कृषी विद्यापीठ करीत असलेल्या सेंद्रीय शेतीत फरक विषद करताना यापुढे शेतकरी आणि कृषी विद्यापीठ यांची सांगड घालून शास्त्रीय पध्दतीने सेंद्रीय शेती करणे आवश्यक असल्याचे सांगितले.त्यादृष्टीने कृषी विद्यापीठाने पाऊल उचलले आहे. सेंद्रीय निविष्ठा महाग आहेत.म्हणूनच सेंद्रीय मालाला चांगले भाव मिळावे, यासाठीच शेतकरी आणि उद्योजक यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. लहाळे यांनी भविष्यात कमी खर्चाची शेती विकसीत करावी लागणार असून, त्यादृष्टीने कृषी विभाग, विद्यापीठाचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. सेंद्रीय शेतीला चांगले भाव मिळाल्यास या शेतीला चांगले दिवस येतील त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करू न देण्याचे प्रयत्न सुरू आहे. २५ शेतकरी डाळ प्रक्रिया उद्योगासाठी एकत्र आल्यास त्यासाठी कृषी विभाग मदत करण्यात तयार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.
विषमुक्त, शाश्वत शेतीसाठी सेंद्रीय शेतीच फायदेशीर !
By admin | Updated: December 22, 2014 00:31 IST