नववीचा अंतिम निकाल, दहावीतील वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन आणि अंतिम तोंडी प्रात्यक्षिक या आधारे शाळांनी बोर्डाकडे गुण पाठविले होते. त्यानुसार दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. निकालाविषयी विद्यार्थी व पालकांमध्ये मोठी उत्सुकता होती. कोरोनामुळे प्रथमच विद्यार्थ्यांना परीक्षेविना दहावी उत्तीर्ण करावी लागली. त्यामुळे दहावीचा निकाल कसा लागेल, किती गुण मिळतील, याविषयी पालकांच्या मनात संभ्रम होता. परंतु, निकाल लागल्यानंतर तो संभ्रम दूर झाला. जिल्ह्याचा निकाल ९९.९९ टक्के लागल्यामुळे जिल्ह्यातील शाळांनी समाधान व्यक्त केले.
पाच तालुक्यांचा निकाल शंभर टक्के!
जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर आणि मूर्तिजापूर तालुक्यांचा समावेश आहे. अकोला तालुक्याचा निकाल ९९.९९ टक्के, तर बार्शीटाकळी तालुक्याचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. एकंदरीत निकालावरून यंदा ग्रामीण भागातील शाळांचा निकाल दर्जेदार लागल्याचे दिसून येत आहे.
असा लागला निकाल
राज्य शिक्षण मंडळाच्यावतीने २९ एप्रिल ते २० मे दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु, कोरोनामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आणि ते संगणक प्रणालीमध्ये नोंदविण्यासाठी माध्यमिक शाळांना नऊ जुलैपर्यंत मुदत दिली होती. शाळांनी संगणक प्रणालीमार्फत विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण व मूल्यमापनाचे गुण विभागीय शिक्षण मंडळाकडे पाठविले. मंडळाने शाळांकडून आलेले गुण एकत्रित करून अंतिम निकाल तयार केला.
संकेतस्थळ क्रॅश झाल्यामुळे शाळांची नाराजी
राज्य शिक्षण मंडळाने दिलेल्या संकेतस्थळांवर जिल्ह्यातील दहावी असलेल्या ३४४ शाळांनी ऑनलाईन निकाल पाहण्याचा प्रयत्न केला. परंतु, दुपारचे तीन वाजल्यानंतरही शाळा आणि विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता आला नाही. एकाचवेळी शाळा आणि विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर भेट दिल्यामुळे साईट क्रॅश झाली. मंडळाने एकच साईट दिल्याने, त्यावर ताण आला. त्यामुळे शाळांसह विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला नाही. त्यामुळे शाळांनी नाराजी व्यक्त केली.
कोरोनामुळे यंदा दहावीची परीक्षा झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन, लेखी परीक्षांचे गुण शाळांमार्फत पाठविण्यात आले. त्यामुळे शाळा आणि विद्यार्थ्यांचा निकाल काय लागणारे हे आधीच माहिती होती. त्यामुळे निकालाविषयीची जी पूर्वीची उत्सुकता होती ती यंदा राहिली नाही. तो उत्साहसुद्धा यंदा राहिला नाही.
- संगीता जळमकर, मुख्याध्यापिका, बालशिवाजी माध्यमिक शाळा
दहावीची परीक्षा न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे गुण शाळांच्याच हाती होते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा निकालाविषयी उत्सुकता नव्हती. कोणता विद्यार्थी टॉपर राहणार, शाळेचा निकाल काय लागणार याची कल्पना होती. यंदा कोरोनामुळे हिरमोड झाला. निकालाविषयी विद्यार्थी, शिक्षकांमध्येही उत्साह नव्हता.
- प्रा. प्रकाश डवले, प्राचार्य डवले पब्लिक स्कूल