तेल्हारा, दि. १६- येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डवर नाफेडकडून सुरू असलेली तुरीची खरेदी १६ फेब्रुवारीपासून बंद करण्यात आली आहे. जागा नसल्याचे कारण देत ही खरेदी बंद करण्यात आली आहे; मात्र अजूनही १0 हजार क्विंटल तूर मार्केट यार्डात पडून आहे. खरेदी केव्हा सुरू होईल, याची माहिती मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यातच शेतकर्यांना वाहनांच्या भाड्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. तेल्हारा तालुक्यात यंदा तुरीचे बर्यापैकी उत्पन्न झाले आहे. खासगी बाजारात तीन ते चार हजार रुपये भाव मिळत असल्याने शेतकर्यांनी नाफेडच्या तेल्हारा येथील खरेदी केंद्रावर मोठय़ा प्रमाणात तूर विक्रीस आणली. नाफेडने १४ फेब्रुवारीपर्यंत ९ हजार ६११ क्विंटल तूर खरेदी केली. तूर साठविण्यासाठी जागा नसल्याने १६ फेब्रुवारीपासून नाफेडने तूर खरेदी केली आहे. शेतकर्यांनी विक्रीस आणलेली १0 हजार क्विंटल तूर परत न्यावी लागणार काय, असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे.
तेल्हा-यात नाफेडची तूर खरेदी बंद!
By admin | Updated: February 17, 2017 02:47 IST