अकोला : शहराच्या भल्यासाठी का होईना मोर्णा नदी स्वच्छतेची मोहीम सुरू होणे गरजेचे आहे. मोर्णा ही अकोलेकरांसाठी भविष्यात वरदान ठरू शकते, हे लक्षात घेऊन मोर्णा स्वच्छतेच्या मोहिमेचे चळवळीत रूपांतर होणे गरजेचे आहे. यासाठी सर्वच अकोलेकरांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. मोर्णा नदीला खरा धोका हा अकोला शहरातच आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. कौलखेडपासून ते पोलीस प्रशिक्षण केंद्रापर्यंत मोर्णा नदीत येणार्या सर्व नाल्यांचे पाणी दुसरीकडे वळविण्याला सर्वप्रथम प्राधान्य दिले पाहिजे. अकोला शहरात नदी काठावर कुठलाही मोठा कारखाना नाही. त्यामुळे कारखान्याचे दूषित पाणी नदीत सोडल्या जाण्याचा प्रश्नच नाही. मोर्णा नदीच्या दोन्ही काठावरील अतिक्रमण काढले जाणेदेखील गरजेचे आहे. अतिक्रमण करणार्यांचा धोका ज्याप्रमाणे मोर्णेला आहे, त्याचप्रमाणे मोर्णेचा धोका या अतिक्रमणकर्त्यांना आहे. नदीचे दोन्ही काठ स्वच्छ करून त्यांचे सुशोभीकरण केले जावे. मोर्णेतील जलकुंभी काढून मोर्णेचा प्रवाह मोकळा केला पाहिजे. तिचे खोलीकरणदेखील होणे आवश्यक आहे. गाळ काढून पात्र खुले केले गेले पाहिजे. एवढी कामे जरी झाली तरी मोर्णा पूर्वीसारखी वाहू लागले. अकोला शहराची लोकसंख्या भरपूर आहे. शहरात सामाजिक संस्थांची संख्यादेखील मोठी आहे. या सामाजिक संस्थांनी इतर कामे काही दिवस बाजूला ठेवून जर मोर्णा स्वच्छतेचे काम हाती घेतले तर एक महिन्याच्या आत मोर्णा मोकळी होऊन जाईल. सध्या संपूर्ण देशात स्वच्छतेची मोहीम मोठय़ा जोरात सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी सर्वांच्या हातात झाडू दिला. अकोल्यातदेखील झाडू हातात घेणार्यांची संख्या कमी नाही. झाडू हातात घेऊन फोटो काढून स्वत:ला गाडगेबाबानंतर आम्हीच, असे समजणारेदेखील भरपूर आहेत. या सर्वांनी महिनाभर एक तास मोर्णेच्या स्वच्छतेसाठी द्यावा, म्हणजे मोर्णाही स्वच्छ होईल आणि त्यांनाही आपण काहीतरी केले याचे समाधान मिळेल.गाव आपले आहे आणि नदी आपली आहे, ही भावना यापुढे सर्व नागरिकांना ठेवावी लागणार आहे. भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी मोर्णा जर प्रवाही राहिली तर त्याचा फायदा अकोलेकरांना मिळू शकतो. हे सर्व लक्षात घेऊन मोर्णा स्वच्छता मोहीम एक चळवळ म्हणून हाती घेण्याची आवश्यकता आहे. आजच जर आपण सावध होऊन मोर्णेचे संरक्षण केले नाही तर उद्या मोर्णा भावी पिढीला फक्त चित्रातच दाखवावी लागेल. प्रयाग येथील धार्मिक मान्यता असलेली सरस्वती नदी आज लुप्त झाली आहे. ही नदी लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळेच लुप्त झाली. तशी अवस्था मोर्णेची होऊ नये यासाठी अकोलेकरांनी आतापासून प्रयत्न करणे आवश्यक आहे.
मोर्णा स्वच्छता चळवळ व्हावी
By admin | Updated: December 15, 2014 01:10 IST