अकोला : कोल्हापूर महापालिकेने हद्दवाढीचा ठराव पारित केल्यानंतर अकोला महापालिकेच्या हद्दवाढीची चर्चा सुरू झाली आहे. कोल्हापूर मनपाने आता हद्दवाढीचा ठराव घेतला आहे; परंतु या महापालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव शासनदरबारी धूळ खात पडला आहे. अकोला मनपाची हद्द वाढविण्याची अंमलबजावणी या जानेवारीमध्येच होणार होती. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लागल्या आणि आटोपल्या आहेत. या निवडणुका होण्यापूर्वीच शासन हद्दवाढ करेल, अशी अपेक्षा होती. आता मात्र हद्दवाढीचे चित्र धुसर झाले असले तरी कोल्हापूर मनपाने घेतलेल्या ठरावानंतर या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली आहे. हद्दवाढ झाल्यास यात शहरालगतच्या २७ गावांचा समावेश महापालिका क्षेत्रात होणार आहे. महापालिकेची स्थापना झाली तेव्हापासूनच हद्दवाढीची चर्चा सुरू आहे. या महापालिकेचे पहिले आयुक्त लक्ष्मीकांत देशमुख यांनी हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यानंतरच्या आयुक्तांनीही प्रयत्न केले; परंतु सरपंच संघटनेचा हद्दवाढीला विरोध आहे. राजकीय समीकरणे बदलणार असल्याने अनेकांना हद्दवाढ नको आहे. या सर्व पृष्ठभूमीवर हा प्रस्ताव लांबणीवर पडला आहे. महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी हद्दवाढ करणे क्रमप्राप्त आहे; परंतु त्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज असल्याचे मनपाच्या काही मोजके अधिकारी, पदाधिकार्यांचे मत आहे. हद्दवाढ झाल्यास मलकापूर, मोठी उमरी, गुडधी, शिवणी, शिवर, खरप, पाचपिंपळ, भौरद, दाबकी, खडकी, हिंगणा आदी गावांचा महापालिका क्षेत्रात समावेश होईल.
मनपाची हद्दवाढ रखडली
By admin | Updated: June 25, 2014 02:40 IST