अकोला : पश्चिम विदर्भात यावर्षी पिकांना पोषक पाऊस झाला असून, सर्वत्र पिके बहरली आहेत; परंतु किडींना पोषक वातावरण निर्माण झाल्याने कापूस व सोयाबीन पिकांवर किडींनी आक्रमण केल्याने शेतकर्यांसमोर हे नवे अस्मानी संकट उभे ठाकले आहे.पश्चिम विदर्भात पुरक पाऊस झाला असला, तरी धरणे अजून रितेच आहेत. मुरतोनी पाऊस झाल्याने सध्या सर्वच पिके बहरली आहेत; परंतु किडींना पोषक वातावरण तयार झाल्याने पिकांवर वेगवेगळ्य़ा किडींनी हल्ला केला आहे. सद्यस्थितीत या खरीप कापसावर तुडतुडे व सोयाबीनवर हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. पश्चिम विदर्भात ३२ लाख हेक्टरपैकी कापूस आणि सोयाबीनचे क्षेत्र हे २३ लाखांपर्यंत आहे. ही दोन पिके या भागात मोठय़ाप्रमाणावर घेतली जातात, यावर्षी तुरीचे क्षेत्र वाढले असून, ते ४ लाख ९0 हजार हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. इतर कडधान्याची पेरणीदेखील वाढली आहे. मागील तीन ते चार वर्षांनंतर सोयाबीनचे पीक यावर्षी चांगले बहरले आहे. वेळेवर पावसाचा शिडकावा होत असल्याने या पिकाने कात टाकली आहे. शेतकर्यांनी दोनदा या पिकांची कोळपणी, डवरणी केली, तणनाशकांची फवारणी केल्याने शेतातील तण कमी झाले आहे. त्यामुळे यावर्षी मागील चार वर्षांची कसर भरू न निघेल, अशी शेतकर्यांना आशा आहे. त्या दृष्टीने शेतकर्यांनी शेतीची सर्व कामे केली आहेत; परंतु पिकांवर किडींनी आक्रमण करणे सुरू केल्याने शेतकर्यांचा कीटकनाशकांचा खर्च वाढत आहे. कापूस या पिकावर तुडतुडे या किडींनी, तर सोयाबीनवर हिरवी उंटअळी व केसाळ अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. ---कापसावर तुडतुडे व सोयाबीनवर हिरव्या उंटअळ्य़ांचा प्रादुर्भाव झाला आहे. कापसावरील तुडतुड्यांचा नायनाट करण्यासाठी सुरुवातील निंबोळी अर्काचा वापर करावा, कीड जास्त असेल, तर कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार फवारणी करावी.डॉ. प्रशांत नेमाडे, कापूस कीटक शास्त्रज्ञ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
कापूस, सोयाबीनवर किडींचा हल्ला!
By admin | Updated: July 25, 2016 01:32 IST