अनिल गवई/ खामगाव(जि.बुलडाणा):जीवनात अथवा कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकपणा आणि परिश्रम आवश्यक आहे. या दोन गोष्टींशी एकरूप झालं की, जीवनात कशाचीही कमी पडत नाही. त्यामुळे कलावंतांनी आपल्या कलेचे सादरीकरण करताना कलेशी एकरूप व्हावं अशी अपेक्षा ज्येष्ठ सिने कलावंत रविंद्र बेर्डे यांनी व्यक्त केली. जीवनात चढ उतार असतातच पण या दोन गोष्टींमुळे संकटकाळातही भरारी घेता येते असा ठाम विश्वास त्यांनी २२ नोव्हेंबर रोजी खामगाव येथे 'लोकमत' सोबत मनमोकळा संवाद साधताना व्यक्त केला.
प्रश्न : चित्रपट क्षेत्राशी जवळीक कशी निर्माण झाली ?
आकाशवाणीमध्ये नभोनाट्यांचे दिग्दर्शन करताना नाट्यक्षेत्राची आवड निर्माण झाली. १९६५ मध्ये नभोवाणी आणि त्याचवेळी नाट्यक्षेत्राशी जवळून संबंध आले. नभोवाणीतील २४ वर्षांच्या सेवेनंतर १९८७ पासून नाट्यक्षेत्राकडे वळलो. त्यानंतर काही चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी मिळाली. तेव्हापासूनच सिनेसृष्टीशी वेगळं नातं निर्माण झालं.
प्रश्न : चित्रपटसृष्टीतील आपल्या आजवरच्या प्रवासाबाबत काय सांगाल ?
१९८७ साली नाट्यसृष्टीत पदार्पण केल्यानंतर रंगमंचावर ३१ नाटकं गाजविली. तर ३00 च्या वर मराठी चित्रपटातून अभिनयाची संधी मिळाली आहे. त्याचप्रमाणे ५ हिंदी सिनेमामधून तसेच काही आकाशवाणी, दूरचित्रवाणीच्या जाहीरातींमधून समाज प्रबोधनाची संधी मला मिळाली आहे.
प्रश्न : चित्रपटसृष्टीतील एखादा कटू अनुभव काय ?
निश्चितच नाही ! मात्र १९९५ साली व्यक्ती आणि वल्ली या नाटकाच्या दरम्यान मला हार्टअटॅक आला होता. तसेच २0११ सालापासून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचाही मी सामना करीत आहे. मात्र कलेशी एकरूप असल्यामुळे मला सर्व संकटांवर मात करता आली.
प्रश्न : पुर्वीच्या आणि आताच्या चित्रपटातील तुलनात्मक फरक काय ?
पुर्वीच्या काळी तमाशावर आधारीत चित्रपट निर्माण होत होते. याला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळत होती. त्यानंतरच्या कालावधीत विनोदी चित्रपट निर्माण हाऊ लागले. यामध्ये प्रामुख्याने लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनी मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. आता भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे यांनी मराठी रसिकांवर छाप पाडली आहे. पूर्वी नवीन विषय हाताळला जात नसल्याने प्रेक्षक वर्ग दुरावला होता. मात्र आता ग्रामीण भागातूनही चित्रपट सृष्टीत वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत. हाच महत्वाचा बदल सिनेसृष्टीत झाला आहे.
प्रश्न : सिनेसृष्टीत पुण्या-मुंबईची मक्तेदारी आहे काय? अजिबात नाही ! गेल्या काही वर्षांमध्ये तरूण पिढीचा मराठी चित्रपट सृष्टीत ओढा वाढला आहे. कलावंतांसोबतच दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही मोठी फळी निर्माण होत असल्याने दज्रेदार प्रतिभा समोर येत आहे. त्यामुळे सिनेसृष्टीत पुण्या-मुंबईची मक्तेदारी आहे, असे म्हणता येणार नाही. मात्र कलावंतांची संख्या वाढल्याने त्यांच्यामध्ये चुरस निर्माण झाली. अशा परिस्थितीत एका नाटकामध्ये, चित्रपटामध्ये यशस्वी झालेल्या नटाला अभिनेत्याला दुसर्या चित्रपटात संधी मिळेलच असे सांगता येत नाही. त्यामुळे पूर्वीपेक्षा आता सिनेसृष्टीतील अभिनेत्याची कारकिर्द कमी झाली आहे.
प्रश्न : नवीन पिढीसाठी आपला संदेश काय ?
सिनेसृष्टीला उद्योगाचा दर्जा मिळाला आहे. या उद्योगात टिकून राहण्यासाठी नवोदित कलावंतांनी व्यसनाधिनतेला अजिबात थारा देवू नये. आपल्या कलेशी एकरूप होत रसिक मायबापांच्या सेवेत आपल्या अंगी असलेली कला शेवटच्या श्वासापर्यंत अर्पण करावी, हाच संदेश 'लोकमत'च्या माध्यमातून आपला राहील.