मूर्तिजापूर: तालुक्यातील दुर्गवाडा येथील वीज उपकेंद्रात परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याने परिसरातील ग्रामस्थ वैतागले आहे.
पावसाला सुरुवात होताच वीज पुरवठा खंडित होत असल्याने परिसरात ग्रामस्थांमध्ये विद्युत महामंडळाबद्दल प्रचंड रोष निर्माण होत आहे. परिसरात अजून दमदार पाऊस नसल्यामुळे नागरिक उकाड्यापासून त्रस्त आहेत. रात्रभर विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती निर्माण झाली आहे. गावात अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. दुर्गवाडा उपकेंद्रात बऱ्याच दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क केल्यास उडवाउडवीचे उत्तर मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
-------------------------
वीज पुरवठा सुरळीत करा; अन्यथा आंदोलन
महावितरणने नागरिकांची समस्या त्वरित दूर करून वीज पुरवठा सुरळीत करावा. येत्या आठ दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरणच्या विरोधात ग्रामस्थ आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थ सतीश गवई यांनी दिली आहे.