- आशिष गावंडे
अकाेला: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत विदर्भातील शेतकऱ्यांना दिवसा १२ तास मोफत वीज पुरवठा केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, या योजनेद्वारे डिसेंबर २०२६ पर्यंत १६,००० मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बळीराजा जलसंजीवनी याेजनेतून विदर्भातील रखडलेले ९० सिंचन प्रकल्प मार्गी लागल्याने सिंचन क्षेत्रात लक्षणीय वाढ होऊन शेती उत्पादनात सुधारणा होईल.
व्यासपिठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, कामगार मंत्री तथा अकाेला जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण, प्रदेश सरचिटणीस आ.रणधीर सावरकर आदी उपस्थित हाेते. अकोल्यात ११ जून रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते २,६०० कोटी रुपयांच्या निधीतून मंजूर झालेल्या १९ विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आले. यादरम्यान, भाजपच्यावतीने अकोला क्रिकेट क्लब मैदानावर ‘विकास संवाद सभे’ चे आयाेजन करण्यात आले हाेते. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले की, २०२७ पर्यंत विदर्भाचा अनुशेष संपेल, असा आम्हाला विश्वास आहे. महायुती सरकारच्या धोरणांमुळे विदर्भातील पायाभूत सुविधांमध्ये मोठी प्रगती होत असून, भविष्यातील विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हा विजय खुर्च्या ताेडण्यासाठी नाही!राज्यात दणक्यात महायुतीचे सरकार आले. विधानसभा निवडणुकीतील हा विजय खुर्च्या ताेडण्यासाठी नव्हे तर सर्वसामान्य जनतेची कामे करण्यासाठी मिळाला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यापुढे शासकीय कार्यालयांसाठी १०० दिवसांचा नव्हे तर १५० दिवसांसाठी आराखडा तयार केला जाइल,असे त्यांनी सांगितले.यापुढे शेतीसाठी ‘एआय’चा वापरशेतीमधून कमी खर्चात जास्त उत्पादकता मिळवण्यासाठी भविष्यात ‘एआय’चा वापर केला जाइल. किड प्रतिबंधक उपाय, खतांचा वापर करताना ‘एआय’ची मदत घेतली जाइल. आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यासाठी शासनाकडून ठाेस पाऊले उचलली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.