सायखेड: अकोला जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यानी खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या तूर विक्रीचे चुकारे न झाल्याचे वृत्त लोकमतने ४ एप्रिल रोजी प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांचे चुकारे सुरू केले आहेत. ३१ मार्चनंतर व ४ एप्रिलनंतर जिल्ह्यातील शेतकरी कंपन्यांना महा एफटीओकडून पैसे मिळाले असून, कंपनीकडून ज्या शेतकऱ्यांना तूर विक्री केल्यानंतर पैसे मिळाले नाहीत, त्यांना धनादेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती शेतकरी कंपन्यांकडून मिळाली आहे. यामध्ये बार्शीटाकळीच्या किसान राज कंपनीने खरेदी केलेल्या ३,५०४ क्विंटल तुरीचे चालू आठवड्यात ४७ लाख ७४ हजार ७७५ रुपये मिळाले असून, १९ लाख रुपये बाकी असल्याचे कंपनीचे सचिव प्रकाश माणिकराव यांनी सांगितले. बाळापूर विभागातील बळीराजा कंपनीने खरेदी केलेल्या तुरीचे ३१ मार्चला ३० लाख तर चालू आठवड्यात ३१ लाख रुपये प्राप्त झाल्याची माहिती अंशुमन जाधव यांनी दिली. अकोट अॅग्रो कंपनीने खरेदी केलेल्या ३२०० क्विंटल तुरीचे चालू आठवड्यात ३२ लाख रुपये मिळाल्याची माहिती एजाज अहमद खान यांनी दिली. पूर्णामय आपातापा शेतकरी उत्पादक कंपनीने ४१२३ क्ंिवटल तूर खरेदी केली, यापोटी चालू आठवड्यात ९ लाख १३ हजार ५५० रुपये प्राप्त झाले, अशी माहिती संतोष शेंडे यांनी दिली. पातूरच्या कंपनीने २,५५४ क्विंटल तूर खरेदी केली, त्यांना अद्यापही रक्कम मिळाली नसल्याचे दादाराव देशमुख यांनी सांगितले.कौलखेड जहागीरच्या आधुनिक किसान शेतकरी उत्पादक कंपनीने २१२५ क्ंिवटल तूर खरेदी केली होती, ही तूर ८९ शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आली. ं४ एप्रिल रोजी ४४ लाख प्राप्त झाले असून, ६० टक्के शेतकऱ्यांचे पैसे बाकी असल्याची माहिती मनोज तायडे यांनी दिली. तेल्हाऱ्याच्या शिवार्पण शेतकरी उत्पादक कंपनीलासुद्धा नुकतेच पैसे मिळाल्याची माहिती शिवाजी बहाकर यांनी दिली.शेतकरी उत्पादक कंपन्यांनी तुरीची खरेदी करावीअकोला जिल्ह्यात कृषी उत्पादन बाजार समित्यांच्या यार्डमध्ये सुरू केलेल्या नाफेड केंद्रांवर तूर खरेदीवेळी शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तब्बल एक ते दोन महिन्यांपासून अनेक केंद्रांवर शेतकरी तुरीच्या मापाच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या बारदान्याअभावीसुद्धा तूर खरेदीसाठी विलंब होत आहे. जिल्ह्यातील उत्पादक कंपन्यानी शेतकऱ्यांची तूर खरेदी करताना कोणत्याही रांगा न लावता सरळ पद्धतीने खरेदी केली. त्यामुळे नाफेड केंद्रावर होणारी गैरसोय टाळण्यासाठी शेतकरी उत्पादके कंपन्यांनी पुन्हा तुरीची खरेदी सुरू करावी, अशी मागणी ग्रामीण शेतकरी वर्गाकडून होत आहे.आम्ही शेतकरी उत्पादक कंपन्यांनी तूर खरेदीनंतर तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना चुकाऱ्याचे पैसे मिळण्यास होत असलेल्या विलंबाबाबत २५ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन कळविले होते. सध्या प्राप्त झालेल्या रकमेतून शेतकऱ्यांना धनादेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे.- अंशुमन जाधव, बळीराजा शेतकरी उत्पादक कंपनी बाळापूर विभाग.
अखेर शेतकऱ्यांना मिळाले तुरीचे चुकारे
By admin | Updated: April 8, 2017 01:48 IST