नितीन गव्हाळे/अकोलाआई जिवंत असेपर्यंत पित्याने अपंग मुलीचा सांभाळ केला; परंतु पत्नी गेल्यानंतर पित्याने दुसरे लग्न करून सावत्र आईला घरात आणले. सुरुवातीला सावत्र आईने मुलीच्याप्रती असलेले सर्व कर्तव्य पूर्ण केले; परंतु नंतर अपंग मुलीचा छळ सुरू झाला. पिताही निष्ठूर झाला आणि एक दिवस पोटच्या मुलीलाच त्याने घराबाहेर हाकलून लावले. एका पायाने अधू असलेली ती मुलगी गयावया करून रडली. पिता व सावत्र आईला हात जोडले, विनवण्या केल्या. पण सावत्र आईच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या निष्ठूर पित्याला तिची थोडीही दया आली नाही. अखेर ही मुलगी रविवारी दुपारी पोलीस ठाण्यात न्याय मागायला आली आणि पोलिसांनीही तिच्याविषयी सहानुभूती दाखवित तिला पुन्हा पित्याच्या घरी सोडून दिले. ही करुण कहाणी आहे, एका पायाने अधू असलेल्या दुर्दैवी मुलीची.. शहरातील एका परिसरात ही मुलगी राहते. आई जिवंत असेपर्यंत पित्याने तिचा सांभाळ केला. तिला शिकविले, मोठे केले; परंतु एक दिवस त्या मुलीच्या आईने अचानक या जगाचा निरोप घेतला. तिच्या आईचे जाणे, त्या मुलीसाठी शाप ठरले. पित्याने दुसरे लग्न करून सावत्र आईला घरात आणले. या सावत्र आईचे या मुलीने आनंदाने स्वागत केले. आता हीच आपली आई.. तीच आता आपला आईसारखा सांभाळ करेल.. अशी आशा या मुलीने मनी बाळगली; परंतु तिची ही आशा अल्प काळातच मावळली. या अपंग मुलीवरून तिची सावत्र आई व पित्यामध्ये भांडण होऊ लागले. अखेर पित्याने सावत्र आईसाठी पोटच्या मुलीला घराबाहेर हाकलून लावले. मुलीने माझी चूक तरी काय? मला का बाहेर काढता, असे विचारल्यानंतर निरूत्तर पित्याने तिला घराबाहेर काढले. ऐन तारुण्यात पाऊल टाकलेली ती असहाय मुलगी कोठे जायचे, कुठे राहायचे, या विचारचक्रातच बाहेर पडली.सुरुवातीला ओळखीच्या ठिकाणी, नातेवाईकांकडे तिने कसेबसे दोन ते तीन महिने काढले. त्यांच्याकडे राहायचे तरी किती दिवस? असा प्रश्न तिच्या मनात आला. अन्यायाविरुद्ध आता दाद मागायचीच. या हेतूने ती रविवारी दुपारी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात आली. पोलिसांना तिने तिची करुण कहाणी सांगितली. पोलिसांना, मला मदत करा हो. अशी विनवणी करू लागली; परंतु पोलीस तिला कायदेशीर मदत करू शकत नव्हते. त्यांनीही त्यांची अडचण तिला सांगितली.
पित्याने हाकलले, पोलिसांनी पोहोचविले..
By admin | Updated: December 15, 2014 01:17 IST