उरळ: उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या सोनाळा येथील एका शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. मृतकाच्या खिशात त्याच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्याच्या नावाचा उल्लेख असलेली चिठ्ठी सापडल्यामुळे या प्रकरणाचा गुंता वाढला आहे. उरळ पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, बाळापूर तालुक्यातील सोनाळा येथील दीपक शंकर मामनकर (३२) नामक शेतकर्याने शुक्रवारी सकाळी विठ्ठल ठाकरे यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतक दीपक मामनकर यांच्या खिशात आत्महत्येपूर्वी पोलिस अधीक्षक लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली आहे. अकोल्यातील उमरी येथील डॉ. सुनीता मेंडे यांनी हर्बल लाईन या कंपनीत नोकरीस लावून देतो, असे आमिष दाखवून आपणाकडून २ लाख १२ हजार रुपये घेतले; परंतु अद्यापपर्यंत नोकरी मिळाली नाही. वारंवार तगादा लावूनही त्यांनी पैसे परत केले नाही, म्हणून आपण जगाचा निरोप घेत आहोत, असा मजकूर या चिठ्ठीत आहे. परंतु, त्यावर मृतकाची स्वाक्षरी नसल्यामुळे ही चिठ्ठी मृतक दीपक यांनीच लिहिलेली आहे का, याचा शोध सुरू असल्याचे उरळ पोलिसांनी सांगितले. दरम्यान, मृतक दीपक मामनकर यांच्यावर बँकेचे १ लाख २० हजार रुपयांचे कर्ज असल्याचे समजते. भगवान डिगांबर उगले यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दीपक यांच्या पश्चात १ मुलगा व पत्नी असा परिवार आहे. पुढील तपास पीएसआय संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनात जमादार कैलास पेटकर, पोकॉ शालिग्राम इंगळे करीत आहेत.
सोनाळा येथे शेतकर्याची आत्महत्या
By admin | Updated: May 16, 2014 20:09 IST