बाळापूर : शहरासह तालुक्यातील अनेक रोहित्रांमध्ये बिघाड झाल्याने कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे पाणी असूनही विजेअभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. याकडे महावितरणने लक्ष देऊन रोहित्रांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
बाळापूर येथील काळबाई शेत शिवारातील कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे वीज रोहित्र गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे. काळबाई शिवारातील शेतकऱ्यांनी रबी हंगामात कांदा, गहू, हरभऱ्याची पेरणी केली आहे. सद्य:स्थितीत पिके बहरलेली असून, पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. गत पंधरा दिवसांपासून रोहित्रात बिघाड झाल्याने पाणी देता येत नाही. त्यामुळे पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना माहिती दिली. मात्र, अद्यापही दुरुस्ती न केल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. याकडे महावितरणच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन काळबाई शिवार व तालुक्यातील इतर नादुरुस्त असलेले रोहित्र दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
थकीत वीज बिलांची वसुली
थकीत वीज बील भरल्याशिवाय रोहित्र दुरुस्त न करण्याची तंबी अधिकाऱ्यांनी दिल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अवाच्या सव्वा आलेले वीज बिल भरण्यासाठी पैसा कोठून आणावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. राज्यातील सर्व वीज रोहित्र तात्काळ सुरू करण्याचा आदेश असतानाही बाळापूर उपविभागातील वीज रोहित्रे दुरुस्त करण्यासाठी वीज वितरण कंपनी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.