संतोष येलकर/अकोलामहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यातील ग्रामपंचायतींमार्फत गेल्या तीन वर्षांमध्ये करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीच्या कामांची विशेष तपासणी केली जाणार जाणार आहे. माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षक तसेच विद्यार्थ्यांच्या हरित संरक्षण गटांकडून येत्या १५ सप्टेंबरपर्यंत ही तपासणी केली जाणार आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतींमार्फत वृक्ष लागवड कार्यक्रम राबविला जातो. रस्त्याच्या दुतर्फा, पडीक शेतजमीन, शाळा, सार्वजनिक आरोग्य केंद्रांच्या परिसरात वृक्ष लागवड केली जाते. लागवड केलेल्या रोपांचे संगोपन व संरक्षण करण्याची जबाबदारीही काही कुटुंबांवर सोपविली जाते. या पृष्ठभूमीवर सन २0११, २0१२ आणि २0१३ या तीन वर्षाच्या पावसाळी हंगामात ग्रामपंचायतींमार्फत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची विशेष तपासणी करण्याचे निर्देश राज्य शासनाच्या नियोजन विभागामार्फत गत १९ ऑगस्ट रोजी एका परिपत्रकाव्दारे देण्यात आले होते. त्यानुसार ही विशेष तपासणी २५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत केली जाणार आहे. वृक्ष लागवड झाली नाही, रोपे जीवंत आहेत की नाही, ज्या ठिकाणी रोपे जीवंत नाहीत, त्या ठिकाणी पुनर्लागवड करणे, अशी सुधारणात्मक कृती हाती घेणे हा या विशेष तपासणी मोहिमेचा उद्देश आहे. विशेष तपासणी मोहिमेसाठी जिल्हानिहाय समित्या गठित करण्यात आल्या आहेत. संबंधित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील या समित्यांमध्ये सदस्य सचिव म्हणून सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक आणि सदस्य म्हणून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), उपजिल्हाधिकारी (रोहयो), शिक्षणाधिकरी इत्यांदींचा समावेश आहे. तपासणीचा अहवाल हरित संरक्षण गटांमार्फत सामाजिक वनीकरण विभागाच्या उपसंचालक व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हानिहाय अहवाल शासनाच्या संबंधित विभागाकडे सादर करण्यात येणार आहेत.उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रमोदसिंह दुबे यांनी ग्रामपंचायतींच्या वृक्ष लागवडीची विशेष तपासणी करण्याबाबतचे शासन परिपत्रक २२ ऑगस्ट रोजी प्राप्त झाले. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींपैकी एक तृतीयांश ग्रामपंचायतीअंतर्गत झालेल्या वृक्ष लागवडीच्या कामांची तपासणी १ सप्टेंबरपासून अकोला जिल्ह्यात सुरु करण्यात आहे. ज्या ठिकाणी हरित संरक्षण गटांची संख्या कमी आहे, अशा ठिकाणी तपासणीच्या कामासाठी एनएसएस विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार असल्याचे सांगीतले. *वृक्ष लागवडीच्या कामाचे वास्तव येणार समोर!ग्रामपंचायतीअंतर्गत गेल्या तीन वर्षांत करण्यात आलेली वृक्ष लागवडीची विशेष तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये ग्रामपंचायतींनी केलेली वृक्ष लागवड, त्यावर करण्यात आलेला खर्च आणि सध्या जीवंत असलेली रोपे याबाबतचे वास्तव या तपासणीतून समोर येणार आहे.
ग्रामपंचायतींच्या वृक्ष लागवडीची होणार तपासणी
By admin | Updated: August 29, 2014 01:55 IST