अकोला : पूर्णा नदीचे पाणी प्रदूषित करणार्यांवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसून, कारवाईसाठी दिरंगाई होत असल्याच्या मुद्यावर सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने, बुधवारी जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा चांगलीच गाजली. अमरावती व अकोला येथील ह्यएमआयडीसीह्णमधून पूर्णा नदी पात्रात दूषित पाणी सोडण्यात येत असल्याने नदीचे पाणी प्रदूषित होत आहे. यासंदर्भात संबंधितांवर कारवाईसाठी पूर्णा नदीपात्रात उपोषण करण्यात आले, त्यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. मात्र यासंदर्भात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसून, गेल्या चार-पाच दिवसांपासून पूर्णा नदीपात्रात पुन्हा दूषित पाणी येत असल्याचा मुद्दा सदस्य शोभा शेळके यांनी सभेत उपस्थित केला. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयामार्फत काय कारवाई करण्यात आली, अशी विचारणाही त्यांनी केली. पूर्णेतील दूषित पाण्यासंदर्भात कारवाईसाठी अमरावती, अकोला महानगरपालिका, मूर्तिजापूर नगरपालिका आणि संबंधित एमआयडीसींना पत्र पाठविण्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयाच्या प्रतिनिधीने या सभेत दिली. पूर्णेतील दूषित पाण्याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नसून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याच्या मुद्यावर शोभा शेळके, चंद्रशेखर पांडे, पुंडलिक अरबट व इतर सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यासंदर्भात कारवाई करण्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दिरंगाई केली जात असून, याबाबत ह्यएफआयआरह्ण दाखल करण्याची मागणी सदस्यांनी केली. जिल्हा परिषद अंतर्गत २१ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांच्या गहाळ झाल्याप्रकरणी, नस्त्या अद्याप मिळाल्या नसल्याने, त्याला जबाबदार कोण, अशी विचारणा सदस्य हिंमत घाटोळ यांनी शिक्षणाधिकार्यास केली. जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला उपाध्यक्ष गुलाम हुसेन देशमुख, सभापती गोदावरी जाधव, रामदास मालवे, द्रौपदा जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार, सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद इनामदार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पूर्णेतील दूषित पाण्याबाबत कारवाईत दिरंगाई
By admin | Updated: January 15, 2015 00:38 IST