खामगाव : लहान कुटुंबांची शान की सवारी म्हणून प्रचलित असलेल्या दुचाकीवरून आता सर्रास मालवाहतूक केली जाते. याकडे प्रादेशिक परिवहन विभागाने कानाडोळा केल्याने विविध खाद्यपदार्थांसह सिलिंडर आणि मिनरल वॉटरचे जार पोहचविण्यासाठीही दुचाकींचा वापर होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे अरुंद गल्ली-बोळीतून मालवाहू वाहने जात नसल्याने खाद्यपदार्थांची विक्री करणार्यांसह दैनंदिन गरजेच्या वस्तू विकणार्यांनी दुचाकीवरून मालवाहतुकीसाठी विशेष संरचना करून घेतली आहे. दूध विक्रेत्यांच्या कॅन वाहतुकीची शक्कल पाहून मिनरल वॉटर जारचा पुरवठा करणार्यांनीही वाहतूक खर्चात बचत करण्यासाठी दुचाकीवरूनच कॅनचा पुरवठा करणे सुरू केले आहे. दरम्यान, दुचाकीवरून मालवाहतुकीसंदर्भात राज्य शासनाचे ऑक्टोबर २0१0 चे परिपत्रक अस्तित्वात येण्यापूर्वी केंद्रीय मोटार वाहन कायदा ६६ आणि १९२ अ नुसार अशा वाहनांवर कारवाई केली जात होती. आता कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने राज्य शासनाचा महसूल बुडत आहे.
*दुचाकींवरील मालवाहतूक
ऑक्टोबर २0१0 ते सन २0१३ पर्यंत दुचाकींवरून वाहतूक करणार्या (ट्रान्सपोर्ट) मुंबईसह राज्यात दहा हजार दुचाकींची नोंद करण्यात आली आहे. हा आकडा गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढला असून, खात्रीलायक सूत्रांनुसार मालवाहतूक करणार्या दुचाकींचा आकडा तीस हजाराच्याही वर असल्याची माहिती आहे.
*नियम पायदळी!
दुचाकीवरून मालवाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर केंद्र शासनाच्या आदेशानंतर राज्य शासनाने परिपत्रक काढून मालवाहतूक करणार्या दुचाकींना ट्रान्सपोर्ट परवाना देण्याची तरतूद केली आहे. त्याचप्रमाचे अशा दुचाकी चालविणार्यांना ट्रान्सपोर्ट वाहतूक परवानादेखील दिला जातो; मात्र राज्यातील सर्वच ठिकाणी नॉन ट्रान्सपोर्ट परवान्यावरच दुचाकीवरून मालवाहतूक होत असून, याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने गेल्या काही वर्षांत राज्यात दुचाकींवरून मालवाहतूक वाढीस लागली आहे.