लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: चित्रपटाची कथा व्हावी, असा आयुष्याचा प्रवास. बालपणीच आई-वडिलांची हत्या. नातेवाइकांनी अनाथाश्रमात टाकून दिले. अनाथाश्रमातून बाहेर पडताच दाही दिशा मोकळ्या; पण जायचे कोठे माहीत नाही. नोकरी करण्याची तयारी; पण कागदपत्रे नाही. मग आयुष्य जगायचे कसे, हा मोठा प्रश्न; परंत आयुष्याचे रडगाणे गात न बसता स्वबळावर अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करू न नोकरी करतो. आज हा २८ वर्षीय युवक सागर रेड्डी आपल्यासारख्या अनेक मुला-मुलींचे आयुष्य एकता निराधार संघटनेच्या माध्यमातून सुंदर करीत आहे. सागर रेड्डी याने शुक्रवारी सायंकाळी प्रमिलाताई ओक सभागृह येथे अकोलेकरांसोबत संवाद साधला. सागरने आपला संघर्षमय जीवन प्रवास सांगितला. सागर रेड्डीने संवादाच्या पहिल्याच टप्प्यात सांगितले की, माझा नातेवाईक आणि नात्यांवर अजिबात विश्वास नाही. विश्वास तो फक्त मैत्रीवर आहे. ‘सैराट’ यंदाचा गाजलेला मराठी चित्रपट़ कथानकाचा शेवट ज्याप्रमाणे होतो, तोच शेवटचा प्रसंग सागर रेड्डीच्या आयुष्यात बालपणी आला. एक वर्षाचा असतानाच त्याच्या आई-वडिलांची हत्या त्याच्या समोरच करण्यात आली. काही वर्ष आजोबांजवळ राहिला. आजोबांच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी त्याला लोणावळ्याच्या अनाथाश्रमात टाकले. १८ वर्षानंतर अनाथाश्रमाच्या बाहेर पडल्यानंतर कोठे जायचे, काय करायचे, कसे जगायचे, असे प्रश्न पडले. पाऊस पडत होता. एक रात्र आश्रमाजवळच्या मंदिरातच काढली. दुसऱ्या दिवशी मुंबई गाठली. जवळ पुराव्यादाखल कागदपत्रे नसल्याने नोकरी मिळाली नाही. रेल्वे स्टेशनवरच मुक्काम होता. खायला काही मिळत नव्हते. रेल्वे स्टेशनसमोरच केबल टाकण्याचे काम सुरू होते. तेथे जाऊन कामाची विचारपूस केली. केबल ओढण्याचे काम मिळाले. अनाथाचं प्रमाणपत्र जवळ होतं; पण रेड्डी आडनावामुळे ओपन कॅटेगिरीत मोडल्या जात असल्यामुळे पूर्ण फी भरावी लागत होती. जेव्हा पहिल्यांदा उच्चशिक्षणासाठी प्रयत्न केला तेव्हा कळलं की अनथांसाठी कोटा नसतो, असे सागर रेड्डीने सांगितले. आज सागर नामांकित कंपनीमध्ये अभियंता आहे.नोकरी करू न जमा केलेली १८ लाखांची पुंजी सागरने अनाथ मुला-मुलींकरिता खर्च केला. आज १,४०० अनाथ मुलांना सागरने रोजगार मिळवून दिला. विविध २८ देशांचा दौरा करू न युवावर्गाला विनामूल्य मार्गदर्शन करत आहे. अनाथांना स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी सागर लढत आहे. संवाद सभेचे आयोजन निर्भय बनो जनआंदोलन व सेवाश्री बहूद्देशीय संस्थेने केले. कार्यक्रमाचे संचालन गजानन हरणे यांनी केले.
नात्यांवर विश्वास नाही; मैत्री श्रेष्ठ
By admin | Updated: June 3, 2017 01:30 IST