विवेक चांदूरकर/ अकोला: गत एक महिन्यापासून पश्चिम विदर्भाकडे पावसाने पाठ फिरविल्याने जमिनीला भेगा पडल्या आहेत. दिवस आणि रात्रीच्या तापमानात १४ ते १६ डिग्री सेल्सीअसची तफावत निर्माण झाली असून, शेतातील रोपांची मुळं अद्याप जमिनीत खोल रुजलेली नसताना जमिनीला पडलेल्या भेगांमुळे तापमानातील तफावतीचा सरळ परिणाम पिकांवर होऊन पिकं संकटात सापडली आहेत. जून महिन्याच्या प्रारंभी थोडाफार पाऊस झाल्यानंतर, बहुतांश शेतकर्यांनी लगबगीने पेरणी केली; मात्र त्यानंतर पावसाने दडी दिली. एक महिना उलटला तरी, अद्याप पाऊस नाही. त्यामुळे पिके सुकत असून, जमिनीला भेगा पडल्या आहेत. दुसरीकडे दिवसाच्या तापमानात वाढ होऊन, कडक उन पडत आहे. या भागातील तापमान दुपारच्या सुमारास ३८ डिग्रीपर्यंत असते. रात्री घट होऊन, तापमान २२ ते २४ डिग्रीपर्यंत असते. दिवस व रात्रीच्या तापमानात १४ ते १६ डिग्री सेल्सिअसपर्यंत तफावत निर्माण झाली आहे. याचा पिकांवर विपरीत परिणाम पडत आहे. सध्या जमिनीला भेगा पडल्या आहेत. लहान रोपांची मुळे जमिनीत सहा इंचापर्यंत रुजली आहेत. जमिनीतील सहा इंचांपर्यंत माती मुळांना अन्नद्रव्ये मिळण्यासाठी पोषक असते व मुळं अन्नद्रव्ये ग्रहण करीत असतात. सध्या विदर्भात जमिनीला भेगा पडल्याने, जमिनीवरील तापमानाचा सरळ परिणाम मुळांवर होत आहे. यामुळे रोपांची वाढ खुंटली असून, खोड लाल पडत आहे. सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मूग या सर्वच रोपांची मुळं आता लाल झालेली दिसतात. या रोपांना कोणताही आजार आलेला नसून, तापमानातील बदलामुळे रोपे सुकण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. याचा परिणाम उत्पादनावर होणार असून, शेतकर्यांना नुकसानाचा सामना करावा लागण्याची भीती आहे. वातावरणातील बदलामुळे रोपांची मुळं लाल होत आहेत. त्यामुळे रोपे सुकत आहेत. वातावरणातील बदलाचा हा परिणाम आहे. शेतकर्यांचे नुकसान होत असले, तरी यावर कोणताही उपाय नसल्याचे जिल्हा कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांनी सांगीतले.
*उपाय नाहीच
वातावरणातील बदलामुळे पिकांवर हे संकट ओढवले आहे. सध्या रोपांची खोडं लाल होत असून, त्यामुळे रोपे सुकत आहेत. शेतकर्यांचे हे नुकसान भरून न निघण्यासारखे आहे. यावर काहीही उपाय नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. जोरदार पाऊस झाला तर वातावरण थंड होईल, सोबतच जमिनीच्या भेगाही भरून निघतील, त्यानंतर रोपांना फायदा होऊ शकतो.