बुलडाणा : आजचे तरुण तरुणी फक्त मोबाईल, संगणकाद्वारे आपली बौद्धिक पातळीत वाढ करताना दिसत असून, बौद्धिक पातळीबरोबरच खेळाला महत्त्व देण्याची गरज असून, त्यामुळे सर्वांगीण विकास होतो. या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेमधून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होऊन त्यांनी देशाचे नावलौकिक करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष अलका खंडारे यांनी केले.क्रीडा व युवक संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद बुलडाणा यांच्यावतीने आयोजित राजीव गांधी खेल अभियान अंतर्गत राज्यस्तरीय ग्रामीण धनुर्विद्या क्रीडा स्पध्रेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. स्पर्धेचे उद्घाटन बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेचे नितीन शिंगणे, धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष राजेश लहाने, मनोज व्यवहारे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, तांत्रिक समिती सदस्य विजय फसाटे, अविनाश दळवी, गोपालसिंग राजपूत, अशोक जंगमे व क्रीडा शिक्षक तसेच स्पर्धक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. उद्घाटनपर भाषणात राधेश्याम चांडक म्हणाले की, शासनाने नुकत्याच १५ नवीन खेळाचा समावेश केला असून, धनुर्विद्या व तलवारबाजी हे खेळ महाभारत आदी ग्रंथापासुन नावाजलेले असून धनुर्विद्या हा खेळ भुतानमध्ये गल्लोगल्ली खेळल्या जातो. या खेळामध्ये जास्तीत जास्त खेळाडूंनी यश संपादन करून महाराष्ट्राचे नावलौकिक मिळवतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत
By admin | Updated: December 15, 2014 23:40 IST