अकोला : श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीच्या घोटाळ्यातील आरोपी समीर जोशीने धनादेश अनादरणाच्या खटल्याला स्थगिती देण्याची मागणी करणारा अर्ज न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. हा अर्ज आरोपीने शनिवारी केला होता. नागपूर श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीने स्वत:चे औद्योगिक प्रकल्प सुरू केले. कंपनीला या प्रकल्पांसाठी पैशांची गरज भासली. कंपनीने गुंतवणूकदारांमार्फत भांडवल उभे करण्याचा निर्णय घेतला. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने राज्यभर मेळावे घेतले. अकोल्यातील मेळाव्यात १६ पेक्षा जास्त गुंतवणूकदार उपस्थित होते. मेळाव्याला उपस्थित असलेले मधुकर ददगाळ यांनीही गुंतवणूक केली होती. लाभांश म्हणून कंपनीने त्यांना जुलै २0१३ मध्ये एकूण १५ लाखाचे ६ धनादेश दिले; मात्र हे खात्यात पैसे नसल्याने हे धनादेश वटले नाहीत. त्यामुळे ददगाळ यांनी न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, समीर जोशीने आपले वकील आशीष देशमुख यांच्यामार्फत धनादेश अनादरण खटल्याला स्थगिती मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला. महाराष्ट्र बँक ठेवीदार हक्क संरक्षण अधिनियमअन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याने धनादेश अनादरणाच्या खटल्याला स्थगिती देण्याची मागणी आरोपीने केली होती. दोन्ही बाजूच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला. ददगाळ यांच्याकडून अँड. अंकित मोहता यांनी युक्तिवाद केला, तर आरोपी जोशींची बाजू अँड. आशीष देशमुख यांनी मांडली. या धनादेश अनादरणाच्या खटल्यावर आता पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे.
श्रीसूर्या घोटाळा आरोपींचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
By admin | Updated: June 18, 2014 01:14 IST