अकोला/हिवरखेड: दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक सोमवारी सायंकाळी ४.३0 वाजता अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यातील मलकापूर येथे येत आहे. या पथकाच्या दौराच्या पूर्वदिनीच बेलखेड येथील शेतकर्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.हिवरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या बेलखेड येथील अल्पभूधारक शेतकरी गजानन श्रीराम गोमासे (४७) यांनी रविवारी सकाळी दहा वाजताचे सुमारास त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. गोमासे यांच्याकडे एक हेक्टर शेत असून, त्यांच्यावर राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्जही आहे. यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट आल्याने गोमासे हे गत काही दिवसांपासून वैफल्यग्रस्त झाले होते. बँकेचे कर्ज कसे फेडावे व वर्षभर संसाराचा गाडा कसा ओढावा, या विवंचनेतच त्यांनी रविवारी हे टोकाचे पाऊल उचलले. गोमासे यांच्या पश्चात, म्हातारी आई, पत्नी, दोन मुली व एक मुलगा, असा परिवार आहे. तीन महिन्यांपूर्वीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. हिवरखेडचे ठाणेदार अनंत पूर्णपात्रे यांनी त्यांच्या सहकार्यांसह घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक जिल्हात येत असताना शेतकर्यांची आत्महत्या घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
केंद्रीय पथक आज अकोला जिल्ह्यात
By admin | Updated: December 15, 2014 01:15 IST