पाच वर्षांपूर्वी मुस्लीम कब्रस्तानकडे जाणारा पूल जोरदार पावसामुळे वाहून गेला होता. त्यावेळी येथील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी गटविकास अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून, निवेदन देऊन समस्या मांडली होती. मात्र लोकप्रतिनिधींनी नेहमीप्रमाणे कोरडी आश्वासने दिली. पाच वर्षे पूर्ण झाली तरी पुलाचे बांधकाम सुरू झाले नाही. येथील ग्रामस्थ गेल्या पाच वर्षांपासून शासकीय कार्यालयात चकरा मारत असून, अधिकारी केवळ कागदी घोडे नाचविण्यापलीकडे काहीच करत नसल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य वसिम शहा यांनी केला आहे. सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली असून, गावात एखाद्याचे निधन झाले तर दफन विधी करण्यासाठी कसे जायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मृतदेह नेताना मोठी कसरत करावी लागत आहे. पूलच नसल्याने, पाण्यातून मार्ग काढून अंत्यसंस्कार करण्यासाठी कब्रस्तानात जावे लागत आहे.
दुर्घटना होण्याची शक्यता
अचानक नाल्याला पूर आल्यास मोठी दुर्घटना होण्याची भीती असून, प्रशासनाने वेळीच पुलाचे बांधकाम करावे या मागणीसाठी १३ जुलै रोजी प्रमोद सोनोने यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांना निवेदन दिले होते. आठ दिवसांत या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली नाही, तर कब्रस्तानमध्ये बसून आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. निवेदनावर प्रमोद सोनोने, अमन गवई, महेंद्र गवई, वसिम शाह, प्रफुल तायडे, सिद्धार्थ दामले, साजिद शाह, जाकिर शाह, अहमद खान, शेख रेहान, अब्दुल शाह, कुरबान शाह, तुराब शाह, मुजाहिद खान, फैजुल इस्लाम खान आदी गावकऱ्यांच्या सह्या आहेत.
फोटो:
अल्पसंख्याक नागरिकांना कब्रस्तानमध्ये जाण्यासाठी एकच मार्ग आहे. असे असताना प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारीला केराची टोपली दाखविली आहे. आठ दिवसांत पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली नाही तर आम्ही कब्रस्तानमध्ये बसून आंदोलन करू.
-अमन गवई, ग्रामपंचायत, सदस्य
फोटो: