राजरत्न सिरसाट/अकोला : हवामान बदलाचा शेती आणि शेतकर्यांच्या अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी पीक पद्धतीत बदल करणे आवश्यक झाले असून, हवामानाला अनुकूल जाती निर्माण कराव्या लागणार आहेत. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कडधान्य संशोधनावर भर दिला असून, प्रतिकूल वातावरणात तूर डाळीचे उत्पादन कसे वाढवता येईल, यासाठी प्रयोग सुरू केले आहेत. राज्यात सलग चार ते पाच वर्षांपासून पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम सर्वच पिकावर होत असून, कडधान्य पिकावर सर्वाधिक परिणाम होत आहे. मूग, उडीद आणि तूर या पिकांची पेरणी १५ जुलैच्या आतच होणे अपेक्षित आहे. या पिकांची पेरणी ऑगस्टपर्यंत लांबल्यास या पिकांचे ७५ टक्के उत्पादन कमी होते. मूग, उडीद हे अत्यंत संवेदशील पीक आहे. या पिकांची पेरणी जूनमध्ये केल्यासच चांगले उत्पादन होऊ शकते. तूर हे पीक दोन हंगाम अर्थात १६0 ते २00 दिवसांचे आहे. या पिकाची वेळेवर पेरणी तर हवीच शिवाय पाण्याचा ताण अधिक नसणे गरजेचे आहे. अलीकडच्या पाच वर्षांत या पिकाचे उत्पादन कमी झाल्याने त्याचे परिणाम सरळ बाजार व बाजार दरावर दिसून आले आहेत. यावर्षी तूर नसल्याने बाजारात तुरीचे दर सध्या १0 हजार रुपये प्रतिक्विंटल आहेत. याच पार्श्वभूमीवर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने नवे संशोधन हाती घेतले आहे. या पिकाला पाण्याचा ताण बसू नये म्हणून या कृषी विद्यापीठाने तुरीचे रोपे तयार करण्यासाठी पाऊल उचलले आहे. भाजीपाला पिकाप्रमाणे रोपे तयार करू न पाऊस आल्यानंतर ती रोपे पेरली जाणार आहेत. यासाठीचा प्रयोग सध्या राबविण्याचे ठरले आहे. उन्हाळी मूग घेता येतो; परंतु तूर हे पीक तीनही हंगामात घेणे शक्य नसल्याने या प्रयोगावर भर देण्यात येणार आहे. फुले व स्व. वसंतराव नाईक या दोन्ही कृषी विद्यापीठाच्या वतीने हा प्रयोग राबविला जाणार आहे.
कडधान्य उत्पादन वाढविण्यावर कृषी विद्यापींठाचा भर!
By admin | Updated: November 24, 2015 01:11 IST