राजरत्न सिरसाटअकोला, दि १९ : राज्यातील विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणाकडे कल वाढत असून, यावर्षी बीएससी कृषी प्रथम वर्षासाठी उपलब्ध असलेल्या १४,७४७ जागांसाठी तब्बल ६९ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. कृषी अभ्यासक्रमासाठी स्पर्धा वाढल्याने राज्यातील चारही कृषी विद्यापीठात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या आहेत. २३ केंद्रांवर सुरू असलेली ही प्रवेश प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे.राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत शासकीय २,७७४ जागा आहेत तर खासगी कृषी महाविद्यालयांतर्गत १२ हजार विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत शासकीय ७५५ तर खासगी महाविद्यालयाची २,३४0 एवढी प्रवेश क्षमता असून,अहमदनगर जिल्हय़ातील राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ८४४, खासगी ४,५७0, परभणीच्या स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत ७९२, खासगी महाविद्यालय आणि कोकणात दापोली येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची ३५६ तर खासगी महाविद्यालयाची प्रवेश क्षमता १,५५0 एवढी आहे.कृषी पदवीसाठी कृषी अभियांत्रिकी, उद्यानविद्या शास्त्र, वनविद्या शास्त्र, कृषी जैव तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन यासह अनेक विषय आहेत. यामध्ये कृषी या विषयासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा आहे. राज्यात कृषी अभ्यासक्रमाची ९२ महाविद्यालये असून, १९ शासकीय तर ७३ महाविद्यालये खासगी आहेत. शासकीय महाविद्यालयांची प्रवेश क्षमता २ हजार १२ तर खासगी महाविद्यालयांची प्रवेश क्षमता ही ७,२९0 एवढी आहे. म्हणजेच एकूण १४,७४७ जागांमध्ये ९,३0२ जागा कृषीच्या आहेत. प्रवेश प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी व स्पॉट अँडमिशनसाठी यावर्षी खासगी शासकीय महाविद्यालयांना जोडण्यात आली आहेत. येत्या तीन दिवसात प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. याकरिताच खासगी महाविद्यालयाचे प्रवेश कृषी विद्यापीठांच्या शासकीय महाविद्यालयातून केले जात आहेत.
राज्यातील विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणाकडे कल !
By admin | Updated: August 20, 2016 02:45 IST