मागील पंधरा दिवसांत शहरातील विविध भागांत मृत पक्षी आढळल्याने जिल्ह्यात बर्ड फ्लूची भीती पसरली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकाही पक्ष्याचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले नाही. त्यामुळे अकोलेकरांना मोठा दिलासा मिळाला, मात्र जिल्ह्यातील विविध भागात अजूनही मृत पक्षी आढळण्याचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास अकोला वाडेगाव मार्गावरील नकाशी गावातील तलावात ४२ पक्षी मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त त्यांच्या पथकासोबत नकाशी येथे पोहोचले. यावेळी त्यांनी पाहणी करून सहा मृत पक्षी तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याचे सांगितले. जिल्ह्यात आतापर्यंत बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचा एकही अहवाल प्राप्त झाला नाही. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगण्याची गरज नाही, मात्र सतर्कता म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
या पक्ष्यांचा आहे समावेश
नकाशी येथील तलावात आढळलेल्या मृत पक्ष्यांमध्ये कबुतर, तिटवी, घोड यासह इतर प्रजातीच्या पक्ष्यांचा समावेश आहे.
ग्रामस्थांना केले मार्गदर्शन
विविध प्रजातींचे पक्षी मृतावस्थेत आढळल्याने नकाशी येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त यांनी परिसरातील ग्रामस्थांना स्वच्छतेसोबतच निर्जंतुकीकरणांसदर्भात मार्गदर्शन केले.
पक्ष्यांमध्ये इतरही व्हायरल डिसीज
तज्ज्ञांच्या मते, पक्ष्यांचा मृत्यू हा केवळ बर्ड फ्लूमुळेच होत आहे असे नाही. पक्ष्यांमध्ये इतरही प्रकारचे संसर्गजन्य आजार असू शकतात, त्यामुळेदेखील त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नकाशी तलावात ४२ पक्षी मृतावस्थेत आढळले असून, त्यापैकी सहा पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकाही पक्ष्यांच्या मृत्यूचे कारण बर्ड फ्लू नसल्याने घाबरण्याचे कारण नाही. पक्ष्यांमध्ये इतरही व्हायरल डिसीस सुरू आहे.
-डाॅ. तुषार बावणे, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, अकोला