अकोला : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पीक नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्यांना मदतीचे वाटप करण्यात येत आहे. गुरुवारपर्यंत ३१ हजार ९५६ गारपीटग्रस्त शेतकर्यांना ३६ कोटी ३० लाख ७० हजार ६८८ रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले असून, मदतीची रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. गेल्या २२ फेबु्रवारी ते ११ मार्च या कालावधीत वादळी वार्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यात ४७ हजार २२० शेतकर्यांच्या पिकांचे ५० टक्क्याच्यावर नुकसान झाले. ५० टक्क्याच्यावर पीक नुकसान भरपाईसाठी गारपीटग्रस्त शेतकर्यांकरिता शासनामार्फत मदतीचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी ५७ कोटी ५ लाखांचा निधी शासनामार्फत मंजूर करण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ६ कोटी, दुसर्या टप्प्यात २१ कोटी आणि तिसर्या टप्प्यात ३० कोटी, असा एकूण ५७ कोटींचा मदतनिधी प्राप्त झाला. तहसील कार्यालयांमार्फत गारपीटग्रस्त शेतकर्यांना मदत वाटपाचे काम महिनाभरापासून सुरू आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील एकूण गारपीटग्रस्त ४७ हजार २२० शेतकर्यांपैकी ३१ हजार ९५६ शेतकर्यांना २९ मे पर्यंत ३६ कोटी ३० लाख ७० हजार ६८८ रुपयांची मदत वाटप करण्यात आली. मदतीची रक्कम संबंधित शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.उर्वरित १५ हजार २६४ गारपीटग्रस्त शेतकर्यांना २० कोटी ६९ लाख २९ हजार ३१२ रुपयांची मदत वाटपाची प्रक्रिया जिल्हा प्रशासनामार्फत सुरू आहे.
**तालुकानिहाय अशी वाटप करण्यात आली मदत!
तालुका रक्कम
अकोला ६,०१,५०,१३४
बार्शीटाकळी ६,४३,३३,८५४
आकोट ८७,२५०
तेल्हारा १,२१,१६,३५०
बाळापूर ५,९३,१०,२५०
पातूर ७,८५,३७,५५०
मूर्तिजापूर ८,८५,३५,३००
एकूण ३६,३०,७०,६८८