चिचोंडी पाटील :
नगर तालुक्यातील आठवड येथील शेतकरी नानासाहेब मोरे यांचा विद्युत वहिनीची तार अंगावर पडल्याने मृत्यू झाला. या शेतकरी कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अन्यथा मयत शेतकऱ्याचा दशक्रिया विधी महावितरण कार्यालयात करू, असा इशारा देणारे निवेदन भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता एन. एम. धर्माधिकारी यांना दिले.
कोकाटे म्हणाले, महावितरण विभागाच्या गलथान कारभारामुळे एवढी मोठी दुर्दैवी घटना घडून एक शेतकरी कुटुंब उद्ध्वस्त झाले असतानाही अद्यापपर्यंत महावितरण विभागामार्फत कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्याच मयत शेतकऱ्याचे जर वीजबिल थकीत असते तर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्या शेतकऱ्याच्या घरी वीजबिल वसुलीसाठी, वीजपुरवठा खंडित करण्यासाठी चकरा मारल्या असता. त्याच शेतकऱ्याचा महावितरण कंपनीच्या चुकीमुळे मृत्यू झाला आहे, तरी एकाही अधिकाऱ्याला त्या शेतकरी कुटुंबाच्या घरी जावेसे वाटले नाही, ही लाजिरवाणी बाब आहे.
शेतकऱ्याचा दशक्रिया विधी होण्यापूर्वी त्या शेतकरी कुटुंबाला तरतुदीनुसार आर्थिक मदत करावी. या घटनेची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा महावितरण कार्यालयातच दशक्रिया विधी करू, असा इशारा कोकाटे यांनी दिला.