श्रीगोंदा : जन्माला येताना प्रत्येकाचा मेंदू रिकामा असतो. आपण मेंदूत काय भरतो यावर माणूस घडत असतो. अनेक दिव्यांग विद्यार्थी अनंत अडचणींवर मात करत यशाचे शिखर सर करतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही ध्येय गाठणारच अशी जिद्द बाळगून जीवनात यशस्वी व्हावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते यजुवेंद्र महाजन यांनी केले.
महाजन यांनी सनदी अधिकारी पदाचा त्याग करून दिव्यांग, गोरगरीब एक हजार विद्यार्थ्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले आहे. त्यांचे व्याख्यान श्रीगोंदा येथे अग्निपंख फाउंडेशनने आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे होते.
यावेळी नाशिकचे उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, पोलीस उप अधीक्षक अण्णासाहेब जाधव, प्राचार्य गोविंदराव निंबाळकर यांच्या हस्ते सैन्य दलात दाखल झालेल्या १९ जवानांचा सन्मान करण्यात आला. तसेच दीनमित्र या वृत्तपत्राचे १९१० ते १९६२ या कालखंडातील ५२ वर्षातील दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांचे अग्रलेख प्रकाशित केलेले दहा खंड अरूण आनंदकर यांना सांस्कृतिक वारसा संवर्धन ट्रस्टने भेट दिले.
आनंदकर म्हणाले, माझा दहावीत अपघात झाला. एक हात निकामी झाला. त्याच वेळी ठरविले अधिकारी व्हायचे. तो माझ्या जीवनातील टर्निंग पाॅईंट ठरला.
अण्णासाहेब जाधव म्हणाले, दहावीपर्यंतचे शिक्षण आश्रमशाळेत घेतले. त्यानंतर परिस्थितीमुळेच शिक्षणाची दशा झाली. अशा परिस्थितीत पोलीस उपअधीक्षक होण्याचे स्वप्न साकार केले. यामध्ये आई-वडिलांचे पाठबळ महत्त्वाचे ठरले.
प्रास्ताविक मोहनराव आढाव यांनी केले. यावेळी विठोबा निंबाळकर, विशाल चव्हाण यांची भाषणे झाली.
यावेळी एस. पी. लवांडे, नारायण गवळी, वसंतराव दरेकर, गजानन ढवळे, डॉ. अरुण रोडे, डॉ. सुवर्णा होले, अलका दरेकर, प्रतिभा गांधी, शुभांगी लगड, मधुकर काळाणे, शिवदास शिंदे, बी. बी. गोरे, अंकुश घाडगे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रवी पवार यांनी केले.
----
२१ श्रीगोंदा अग्निपंख
श्रीगोंदा येथे सैन्यात भरती झालेल्या जवानांचा सन्मान करण्यात आला.