जामखेड : आमदार रोहित पवार हे आपल्या कार्यपद्धतीने राज्यातील युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. हीच सल भाजप आमदार
गोपीचंद पडळकर यांना असावी. त्यामुळेच स्वतःचे कार्यक्षेत्र, जबाबदाऱ्या सोडून उचापती करत फिरत आहेत. पडळकरांनीच आतापर्यंत तीन पक्ष बदलले. ज्यांचे नेतृत्व मान्य केले त्यांच्यावरच शिवराळ भाषेत टीका केली. पडळकरांसारख्या प्रवृत्तींमुळेच राजकारणातील टीका-टिप्पणीचा दर्जा खालावला, अशी टीका पंचायत समितीचे माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे जामखेड तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे यांनी केली.
पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर केलेल्या टीकेला वारे यांनी उत्तर दिले. वारे म्हणाले, कर्जत-जामखेडची गेली ३० वर्षे तुमच्या पक्षाकडेच सत्ता होती. तुमच्या नेतृत्वाला या परिसराचा विकास करता आला नाही. मात्र आमदार पवारांकडून वर्षभरातच विकासाच्या इतक्या अपेक्षा बाळगता. असो, त्याही अपेक्षांवर रोहित पवार वर्षातच पात्र ठरले आहेत. ते राज्यभर फिरत असले तरी त्यांनी विकासगंगा मतदारसंघात आणली. हे कर्जत-जामखेडच्या जनतेला माहिती आहे.
राहिला प्रश्न केंद्र आणि राज्य सरकारांच्या निर्णयांवर भूमिका व्यक्त करण्याचा तर त्यांचं आकलन सर्वसमावेशक आहे. त्यामुळे असभ्य भाषा वापरून सर्वांचे लक्ष खेचून घेण्याचे उद्योग पडळकरांनी बंद करावेत, अशी टीका वारे यांनी केली.