राहुरी : अहमदनगर जिल्ह्यात शौचालय बांधकामाने गती घेतली असून सर्वांच्या सहकार्याने यंदा ३६२ गावे हागणदारीमुक्त करण्यात येणार आहेत. याशिवाय सांडपाणीमुक्त गाव मोहिमेला बळकटी देण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या सभापती मंजुषा गुंड यांनी केले.जिल्ह्यातील ३६२ गावांतील सरपंच, ग्रामसेवक व स्वच्छतादूत यांची स्वच्छता मिशन कार्यशाळा राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात झाली. त्यावेळी गुंड बोलत होत्या. प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक व स्वच्छतादूत यांनी समन्वयाने काम करावे,आमचा गाव, आमचा विकास हे ब्रीद डोळ्यासमोर ठेऊन काम केल्यास यश मिळेल़ मागील वर्षी ५५ हजार शौचालये बांधण्यात आली़ त्यात आता वाढ करण्यात येणार आहे. प्रास्ताविक जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी उज्ज्वला बावके यांनी केले़ जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले़गणेश शिंदे यांनी अभियानाचे महत्व विशद केले़ महिला व बालकल्याण सभापती मीरा चकोर, कृ षी विभागाचे सभापती शरद नवले यांची भाषणे झाली़ कार्यक्रमास बांधकाम सभापती दिघे, राहुरी पंचायत समितीच्या सभापती मंगल निमसे, गटविकास अधिकारी ईशाधीन शेळकंदे आदी उपस्थित होते़ (तालुका प्रतिनिधी)
यंदा ३६२ गावे करणार हागणदारीमुक्त
By admin | Updated: June 24, 2016 01:17 IST