अहमदनगर : गटनेतेपदाच्या वादाबाबत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी प्रत्येक तारखेला लांबणीवर पडत आहे. त्यामुळे महिला व बालकल्याण समितीची निवडणूक लांबणीवर पडली आहे. यामुळे सभापतीपदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेविकांच्या पतींची अस्वस्थता वाढली आहे. दरम्यान गटनेतेपदावरील मंगळवारी होणारी सुनावणी आता एक आॅक्टोबरला होणार आहे.स्थायी समितीच्या सदस्यांच्या निवडीच्या वेळी गटनेते आणि पक्षीय बलाबल यावरून महापालिकेत वाद झाले होते. हा वाद राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी थेट कोर्टात नेला आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकेची सुनावणी सुरू आहे. प्रत्येक वेळी सुनावणी होण्याऐवजी पुढची तारीख मिळत असल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचाही जीव टांगणीला लागला आहे. गटनेतेपद व पक्षीय बलाबलाच्या वादासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याने कोणत्याही प्रकारचा धोका नको म्हणून सत्ताधारी शिवसेनेने महिला-बाल कल्याण समितीची निवडणूक घेण्याची घाई केली नाही. उच्च न्यायालयात याचिकेचा एकदाचा निकाल लागू द्या, नंतर निवडणूक घेवू असा पवित्रा सत्ताधाऱ्यांनी मांडला होता. मात्र प्रत्येक तारखेला सुनावणीची तारीख लांबणीवर पडत असल्याने शिवसेनेने ज्या नगरसेविकांना शब्द दिला होता, त्यांची अस्वस्थता वाढत आहे. सत्ता येवूनही पदाचा लाभ मिळत नसल्याने सत्ता काय कामाची? असा सूर नगरसेविकेच्या पतीराजांनी आळवला आहे. ज्या अपक्ष नगरसेविकेला शब्द दिल्याने शिवसेनेच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे सभापती म्हणून त्या अपक्ष नगरसेविकेचे नाव निश्चित झाले आहे. (प्रतिनिधी)
महिला बाल कल्याण समिती लटकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2016 23:54 IST