केडगाव : रांगेत असणाऱ्यांनाच लस मिळत नाही. काहींना दहा-दहा चकरा मारूनही लस मिळत नाही. लसीचा तुटवडा आहे, तर उपकेद्रांची बुळबूळ कशासाठी? केडगावला लोकसंख्येच्या तुलनेत लसीचा पुरवठा न केल्यास शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेनेचे नगरसेवक विजय पठारे यांनी दिला.
केडगावमध्ये सध्या लसीचा अपुरा पुरवठा होत असल्याने अनेक नागरिक दिवसभर रांगेत उभे राहूनही लस मिळत नाही. काही वयोवृद्ध व महिला रोज चकरा मारतात, मात्र लस शिल्लक नाही, हाच फलक रोज त्यांना वाचावा लागतो. मनपाकडे लसींचा तुटवडा आहे, तर उपकेंद्रे वाढवून लोकांची धावपळ का वाढविली, असा सवाल करून ते म्हणाले, केडगावची लोकसंख्या १ लाख आहे. आतापर्यंत १० टक्के लोकांनाही लस मिळालेली नाही. रोज अपुरा पुरवठा होत असल्याने लोकांनी किती दिवस रांगेत उभे राहून काढायचे? लोकसंख्येप्रमाणे लसीचा पुरवठा न केल्यास केडगावमधील शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी नगरसेवक संग्राम कोतकर उपस्थित होते.