पारनेर : तालुक्यात पुढील महिन्यात पाणी टंचाई अधिक जाणवणार असून जानेवारीपर्यंत सुमारे एकशे दहा गावांमध्ये टँकरची गरज भासणार आहे. यातून तालुक्यातील दुष्काळाची भीषणता समोर आली आहे.पारनेर तालुक्यावर सध्या दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे आगामी काळात लोकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा व हाताला काम मिळाले पाहिजे याचा नियोजन आराखडा करण्यासाठी आमदार विजय औटी यांनी शनिवारी पारनेर येथे तलाठी, ग्रामसेवक, सर्व विभागांचे अधिकारी यांच्या उपस्थितीत टंचाई आढावा बैठक घेतली. यावेळी औटी यांनी गावनिहाय पाणी परिस्थिती, कधी टँकर लागेल, चाऱ्याची उपलब्धता, गावामध्ये रोजगार हमी योजनेची कोणती कामे शिल्लक आहेत व सध्या मजुरांची कुठे मागणी आहे याचा आढावा घेतला.घाणेगाव व पारनेरजवळील वाड्या-वस्त्यां रांजणगाव मशीद येथे सध्याच टँकरची गरज असल्याचे तलाठी व ग्रामसेवकांनी सांगितले. टँकरचे प्रस्ताव लवकर देण्याच्या सुचना करण्यात आल्या. वासुंदे, रूई छत्रपती,हिवरे कोरडा, गांजीभोयरे, पाडळीतर्फे कान्हूरसह काही गावांमध्ये डिसेंबरमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल, अशी माहिती देण्यात आली.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता एस.एस.मुळे यांनी तालुक्यात जून अखेर सुमारे शंभरच्याहून अधिक गावांना टँकरने पाणीपुरवठा करावे लागेल असे नियोजन केल्याचे सांगितले. यामध्ये चिंचोली, काकणेवाडी, पळशी, पानोली या गावांमध्ये मजुरांकडून कामाची मागणी असल्याचे ग्रामसेवक व तलाठ्यांनी सांगितले. येथे सोमवारपासूनच काम सुरू करण्याचे आदेश आ. औटी यांनी दिले.पारनेर शहर व वाड्या-वस्त्यांसह तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार होता. तलाठ्याला पारनेर स्वतंत्रपणे देण्यात आले. आमदारांच्या सुचनेवरून तहसीलदार दत्तात्रय भावले यांनी त्यांना जागेवरच नेमणुकीचे पत्र दिले. पिंपळनेर येथील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीशेजारील रोहित्रावर अतिरिक्त विजेचा भार असल्याने त्याची क्षमता वाढविण्याची मागणी सरपंच आर.बी.रासकर यांनी केली. रोहित्राची क्षमता वाढविण्याविषयीच्या सूचना आ. औटी यांनी ‘महावितरण’ ला केली. लोणी हवेलीचे ग्रामसेवक व तलाठी हे दोन्हीही बैठकांना गैरहजर असल्याने तेथील गावाचा आढावाच घेता आला नाही. यावेळी सभापती गणेश शेळके, रामदास भोसले, गटविकास अधिकारी किरण महाजन आदी हजर होते. (तालुका प्रतिनिधी)
११० गावांमध्ये पाणी टंचाई
By admin | Updated: November 15, 2014 23:38 IST