अहमदनगर : कृषी विभागाने जिल्हानिहाय, तालुकानिहाय खरीप हंंगामाच्या यशस्वीतेसाठी बियाणे, खतांचे नियोजन केलेले आहे. मात्र, गावनिहाय पाण्याचे नियोजन होणे आवश्यक असून ते झाले तरच हंगाम यशस्वी होऊ शकतो, असा विश्वास पालकमंत्री मधुकरराव पिचड यांनी व्यक्त केला. जिल्हा नियोजन मंडळाच्या सभागृहात खरीप हंगामाच्या बैठक ते बोलत होते. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी अनिल कवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, जि. प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, सभापती बाबासाहेब तांबे, कैलास वाकचौरे, कृषी अधीक्षक अंकुशराव माने, कृषी विकास अधिकारी विलास नलगे, आत्माचे संचालक शिवाजी आमले आदी उपस्थित होते. पालकमंत्री पिचड म्हणाले की, सुरूवातीला एल निनोमुळे जिल्ह्यात खरीप हंगामात अडचण निर्माण होऊ शकते, अशी परिस्थिती होती. मात्र, नवीन अहवाला नुसार सरासरी पेक्षा चांगला पाऊस होईल असे सांगण्यात येत आहे. मात्र, कृषी विभागाने पीक विम्यावर अधिक भर देणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकर्यांना बोगस खते आणि बियाणे मिळणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील शेतकर्यांना गत वर्षी १ हजार ५२० कोटी रुपयांची मदत देण्यात आलेली आहे. यात चारा, छावणी, गारपीटग्रस्त, नरेगा, पीक विमा यांचा समावेश आहे. तसेच शेतकर्यांना एक हजार ७०० कोटीचा पत पुरवठा करण्यात आलेला आहे. यंदा देखील कृषी विभागाने गावनिहाय पीक आणि पाण्याचे नियोजन करावे. जास्तीजास्त चारा पीक घेण्यासाठी प्रयत्न करावेत. आ. पाचपुते यांनी प्रशासनाने एल निनोचा प्रभाव झाल्यास काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, याचा आराखडा करणे गरजेचे आहे. गाळ काढण्याची मोहीम सुरू असताना गेल्या आठ दिवसांत महसूल कडून अडवणूक होत आहे. गाळ आणि मुरूम काढणार्यांना रॉयल्टी भरण्यास सांगण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कवडे यांनी खरीप आणि रब्बी हंगामातील गावांचा निकष बदलून घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. यामुळे प्रत्येक तालुक्याची पैसेवारी सुधारित होईल असे सांगितले. पर्जन्यावर आधारित पैसेवारी आकारली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. शेतीतील आधुनिक प्रयोगाचे सार्वत्रिकरण होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्ताविक माने तर आभार संभाजी गायकवाड यांनी मानले. जिल्हा परिषद सदस्य सुजीत झावरे, शरद नवले, उपस्थित होता.(प्रतिनिधी)घोसपुरी पाणी योजनेचे जिल्हा परिषदेकडे हस्तांतरण रखडलेले आहे. या योजना बंद असल्याने जनतेचे हाल होत आहेत. जिल्हा परिषदेने याकडे लक्ष द्यावेत. पूर्वी मी बोलत नव्हतो, पण आता बोलणार. प्रत्येकाने स्वत:चे काम केले पाहिजे. महावितरणने आपल्या कामकाजात सुधारणा करावी, आकडेबहाद्दरांवर कारवाई करावी अशी मागणी आ. पाचपुते यांनी केली.बैठकीत आ. पाचपुते संतप्त झाले असल्याचे सर्वाच्या लक्षात आले होते. यामुळे समारोपाला पालकमंत्री पिचड यांनी बबनराव नाराज होऊ नका, अच्छे दिन आने वाले है ! असे म्हणताच सभागृहात खसखस पिकली.
पाणी नियोजन महत्वाचे
By admin | Updated: May 27, 2014 00:29 IST