अहमदनगर: धोकादायक इमारतीची भिंत कोसळून त्याखाली दबून एक जण ठार झाला. सुदाम विठ्ठल कामिनसे असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. चितळे रस्त्यावरील नेहरू भाजी मार्केट परिसरात बुधवारी दुपारी ही घटना घडली. कामिनसे (वय, ५५, रा. बुरूडगाव रोड) हे जुना बारदाना (रिकाम्या गोण्या) भाजी विक्रेत्यांकडून गोळा करतात. नंतर त्या व्यापार्याला ठोक भावाने विकतात. गत अनेक वर्षापासून ते हा व्यवसाय करतात. नेहरू मार्केटवर महापालिकेने हतोडा टाकल्याने विक्रेत्यांनी शेजारीच ठाण मांडले आहे. तेथेच विक्रेत्यांनी पत्र्याचे शेड ठोकले आहेत. नेहमीप्रमाणे कामिनसे हे बारदाना घेण्यासाठी तेथे आले. बारदाना गोळा करत असतानाच शेजारील इमारतीच्या वरच्या मजल्यावरील भिंत कोसळली. ती कामिनसे यांच्या अंगावर पडली. भिंतीखाली दबून ते जागीच ठार झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही इमारत सापा यांच्या मालकीची आहे. इमारत धोकादायक झाल्याने तेथे कोणीच राहत नव्हते. महापालिकेने धोकादायक इमारतीचा सर्व्हे केल्याचा दावा केला असला तरी या इमारत मालकाला तशी नोटीस बजावण्यात आली नव्हती. शेजारीच राहणारे मनसेचे संजय झिंजे यांनी ही घटना महापालिका आयुक्त विजय कुलकर्णी, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर काळे यांना कळविली. त्यानंतर यंत्रणा वेगाने हालली. मनपा व जागा मालकावर गुन्हा दाखल करावा कामिनसे यांचा या घटनेत हाकनाक बळी गेला आहे. महापालिकेने धोकादायक इमारतींचा सर्व्हे केलेला नाही. अशा इमारतधारकांना नोटीस बजावलेली नाही. या दुर्घटनेला महापालिका व इमारत मालक जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी मनसेचे संजय झिंजे यांनी केली.
धोकादायक इमारतीची भिंत कोसळून एक ठार
By admin | Updated: September 20, 2023 11:44 IST