पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी व वडगाव गुप्ता येथील नियोजित औद्योगिक क्षेत्र विस्तारीकरणाच्या भूसंपादनास येथील बाधित शेतकऱ्यांचा मागील दहा वर्षांपासून तीव्र विरोध आहे. तरी शासनाने सातबाऱ्यावरील एमआयडीसीचा उल्लेख हटवावा या मागणीसाठी बुधवारी (दि. १८) सकाळी नगर शहरातील औद्योगिक महामंडळाच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी उपोषण केले.
येथील शेतकऱ्यांनी वेळोवेळी शासनाच्या संबंधित विभागास निवेदन देऊन त्यांच्या सातबारा उताऱ्यांवरील शासनाचे शिक्के हटविण्याची मागणी केली. परंतु, त्यांच्या या मागणीला प्रशासनाने केराची टोपली दाखविली आहे.
या परिसरातील शेतकरी अगोदरच अल्पभूधारक असून, त्यांच्या बऱ्याच शेतजमिनी एमआयडीसीमध्ये गेलेल्या आहेत. परिसरातील जमीन बागायती असल्यामुळे शेतकऱ्यांनी या भूसंपादनास विरोध केला आहे. बाधित शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर शासनाचे नाव लागल्यामुळे त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. कुठलीही बँक कर्ज देत नाही. त्यामुळे या मागण्यांसाठी शेतकरी बचाव कृती समितीचे प्रकाश डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केले.
या उपोषणामध्ये विजय डोंगरे, बाळासाहेब शेवाळे, रामनाथ झिने, शिवाजी डोंगरे, एकनाथ मोरे, रावसाहेब शेवाळे, परसराम गुंड, लक्ष्मण गुंड, बाळासाहेब कसबे, रामदास जाधव, नवनाथ भोसले, जालिंदर गुंड, आदी शेतकरी सहभागी झाले होते.
----
१८ वडगाव गुप्ता
पिंपळगाव माळवी, वडगाव गुप्ता येथील शेतकऱ्यांनी नगर येथील औद्योगिक महामंडळाच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले.