लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शाळेची इमारत कोसळून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने संतप्त गावक-यांनी गावातील शाळेला कुलूप ठोकले असून नवीन इमारत उभी करेपर्यत मुले शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला. या घटनेचा निषेध म्हणून ग्रामस्थानी अहमदनगर - बीड राज्यमार्र्गावर दोन तास रास्ता रोको करण्यात आले. यावेळी आ. शिवाजी कर्डीले, आ. राहुल जगताप, शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, संदेश कार्ले, घनश्याम शेलार, संपत म्हस्के यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने रास्तारोकोत सहभागी झाले होते.
सोमवारी सायंकाळच्या सुमारास शाळेची इमारत कोसळून दुर्घटना घडली. तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी गावातील शाळेच्या उर्वरित खोल्यांना कुलुप ठोकण्यात आल्यानंतर अहमदनगर- बीड राज्यमार्गावर सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास रास्तोरोकोस सुरुवात केली. तसेच जोपर्यत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यत माघार घेणार नसल्याची भुमिका ग्रामस्थांनी घेतली. यावेळी गावात दुसरी शाळा उभारण्याची मागणीही करण्यात आली. तसेच मयतांच्या कुटुबियांना जास्तीत जास्त शासकिय मदत मिळावी. सद्यस्थितीतील शाळा ओढ्याच्या कडेला असल्याने सर्व वर्ग पाडण्यात यावेत. शाळा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करुन नवीन वर्ग उभारावेत. जखमींचा सर्व खर्च शासनाने करावा, यासह विविध मागण्या यावेळी ग्रामस्थांनी केल्या.
आ.शिवाजी कर्डीले यांनी ग्रामस्थांना रास्तारोको मागे घेण्याचे आवाहन करत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. फोनवरुन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधला. यावेळी तावडे यांनी गावक-यांच्या सर्व मागण्या मान्य करत असून येत्या आठ दिवसात नवीन शाळेसाठी सर्व मदत करु असे आश्वासन दिले. त्यानंतर साडेअकरा वाजण्याच्या सुमारास रास्ता रोको मागे घेण्यात आला.
फायबरचे वर्ग उद्यापासून उभारणार दरम्यान ग्रांमस्थांनी शाळेला कुलुप ठोकून विद्यार्र्थी शाळेत न पाठविण्याची भुमिका घेतली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून उद्यापासून फायबरचे वर्ग उभारण्यात येणार असल्याचे आ. शिवाजी कर्डीले यांनी यावेळी सांगितले.
ग्रामस्थांच्या मागण्यामयतांच्या कुटुबियांना जास्तीत जास्त शासकिय मदत मिळावी. सद्यस्थितीतील शाळा ओढ्याच्या कडेला असल्याने सर्व वर्ग पाडण्यात यावेत.गावात सुरक्षित ठिकाणी दुसरी शाळा उभारण्यात यावी.जखमींचा सर्व खर्च शासनाने करावा.