श्रीगोंदा : तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून येथे सदस्यपदासाठी ५६७ जागा आहेत. १ लाख २६ हजार ०११ मतदार गाव कारभारी निवडणार आहेत. यातील तीन ते चार ग्रामपंचायती बिनविरोध होतील, अशी शक्यता आहे. मात्र इतर गावांत स्थानिक आघाड्या समोरासमोर असल्याने तुल्यबळ लढती होतील.
५९ ग्रामपंचायतींपैकी जास्तीत जास्त ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी आ. बबनराव पाचपुते यांनी बिनविरोध करणाऱ्या गावास १० लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले होते. तसेच येळपणे जिल्हा परिषद गटातील पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे यांनीही २० लाखांचा निधी देण्याचे जाहीर केले आहे. सध्या निधीपेक्षाही गाव कुणाच्या मागे आहे, याचे ऑडिट करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी समविचारी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पॅनल उभे करण्यासाठी जोरदार हालचाली चालविल्या आहेत. ढवळगाव, सारोळा, निंबवी वगळता इतर गावांत बिनविरोधची आशा मावळत चालली आहे.
जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नागवडे यांचे वांगदरी, कोमल वाखारे यांचे हिंगणी गावाच्या निवडणुकीत विरोधी गटाने एकत्र येण्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे गावात आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी नेते सर्जिकल स्ट्राईक कशा पद्धतीने करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. लिंपणगावमध्ये पाचपुते व नागवडे गटात सरळ सामना होणार आहे. मात्र काही जागेवर बंडखोरी अटळ दिसत आहे.
----
..अन् गाव कारभारी सैरभैर
सरपंचपदाचे आरक्षण ग्रामपंचायत निवडणुकीनंतर निघणार आहे. त्यामुळे अनेक नेत्यांची कोंडी झाली आहे. सरपंचपद गुलदस्त्यात नसल्याने पॅनलचा खर्च कोणी करायचा असा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत तालुका पातळीवर राजकारण करणाऱ्या सेनापतींनी तुमच्या गावची निवडणूक तुम्ही पाहून घ्या, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे गाव कारभारी सैरभैर झाल्याचे दिसते.