देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे योगेश्वर शेतकरी संघाचे संस्थापक विलास वाघमारे यांनी अण्णा हजारेंना पाठिंबा देण्यासाठी प्रजासत्ताक दिनापासून सुरू केलेले उपोषण पाचव्या दिवशी मागे घेतले. अण्णांना केंद्र सरकारने स्वामीनाथन आयोग लागू करू, असे लेखी आश्वासन दिले होते. परंतु, त्याची कार्यवाही सरकार करू शकले नव्हते. त्यामुळे अण्णा ३० जानेवारीपासून केंद्र सरकारविरोधात शेतकरी हितासाठी उपोषण करणार होते. सरकारने आण्णांना दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करावी, त्यांना या वयात उपोषण करण्याची वेळ येऊ नये, देशासाठी महत्वाची व्यक्ती आण्णा आहेत म्हणून आण्णांच्या उपोषणापूर्वी केंद्र सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी विलास वाघमारे हे देवदैठण येथे उपोषणाला बसले होते.
केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राळेगण येथे येऊन केंद्रात एक समिती नेमणार असल्याचे आश्वासन दिल्याने हजारेंनी उपोषण स्थगित केले. त्यानंतर शनिवारी आण्णा हजारे यांच्या सांगण्यावरून विलास वाघमारे यांनी बेलवंडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद माने व ज्येष्ठ नागरिक रामभाऊ कौठाळे यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन उपोषण सोडले.
यावेळी माजी पोलीस अधिकारी बाळासाहेब बनकर, उद्योजक वसंत बनकर, नीलेश गायकवाड, डॉ. सचिन पडवळ, मेजर संजय कौठाळे, कांतीलाल गुंजाळ, संतोष बनकर, अरूण कौठाळे, रवींद्र बनकर, ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : ३० देवदैठण
विलास वाघमारे यांनी पोलीस निरीक्षक अरविंद माने व ज्येष्ठ नागरिक रामभाऊ कौठाळे यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन उपोषण सोडले.