अहमदनगर : संगणकातील आवश्यक माहिती चोरून त्याचा खंडणीसाठी वापर करणाऱ्या चौघांविरुद्ध आधी न्यायालयात खासगी फिर्याद दाखल झाली. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर नगर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. यातील आरोपी अद्याप फरार असून चार वर्षांपूर्वी घडलेल्या या गुन्ह्याचे धागेदोरे शोधण्यासाठी पोलिसांची कसरत सुरू आहे.कोर्टगल्ली येथील अमेय चेंबर्समधील अभिनंदन दिलीप वाळके यांच्या कार्यालयात २०१३ ते २०१५ या कालावधीत वरील गुन्हा घडला आहे. वाळके यांच्या कार्यालयात शीतल संजय वालकर, संजीव उर्फ अभिजित हरिश्चंद्र वांगडे, निलेश गावडे, मनीषा देशपांडे असे चौघे काम करीत होते. चौघांनीही संगणकातील वैयक्तिक माहिती चोरली. या माहितीमध्ये फेरफार करून त्याचा खंडणीसाठी वापर केला. चारही जण वाळके यांना वारंवार बाहेर बोलावून घ्यायचे, शिवीगाळ, दमदाटी करून त्यांना बेदम मारहाण केली आहे. तसेच धमकी देऊन चौघांनी वाळके यांच्याकडून दोन लाख रुपये वसूल केले आहेत. दोन वर्षाच्या काळात वेगवेगळ््या ठिकाणी व अनेकवेळा हे प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक विष्णू ताम्हाणे तपास करीत आहेत.दरम्यान, वाळके यांनी आधी न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. त्यावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)
संगणकातील डेटा चोरुन दोन लाख उकळले
By admin | Updated: September 22, 2015 00:22 IST