अहमदनगर : नगर शहरातील बोल्हेगाव परिसरातील गांधीनगर भागामध्ये महिलांच्या दोन गटामध्ये किरकोळ स्वरूपाचा वाद झाल्यानंतर, फिर्याद दाखल करण्यासाठी आलेले दोन गट तोफखाना पोलीस ठाण्यामध्येच भिडले. एकमेकांवर चाकू, कोयत्याने हल्ला करणाऱ्या या दोन्ही गटातील भांडणे मिटवण्यासाठी अखेर पोलिसांनाच मध्यस्थी करावी लागली. दरम्यान, याप्रकरणी सातजणांना ताब्यात घेतले आहे.
गांधीनगर येथे शुक्रवारी दुपारी एकच्या सुमाराला महिलांच्या दोन गटामध्ये जोरदार वादावादी झाली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी पाठवले. तोपर्यंत या दोन्ही गटाचे लोक फिर्याद देण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलीस ठाण्यात येत असताना हे दोन्ही गट ठाण्याच्या आवारामध्येच एकमेकांना भिडले. यामध्ये एका गाडीच्या काचाही फुटल्या. यात सचिन निकम व त्याचा मित्र गणेश पाटोळे जखमी झाले. पोलीस ठाण्याच्या आवारात हा प्रकार सुरू असतानाच त्या ठिकाणी तोफखाना पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल शैलेश गोमसाळे व वैशाली भामरे यांनी मध्यस्थी करत या दोन्ही गटाला बाजूला केले.
दरम्यान, याप्रकरणी सचिन निकम यांच्या फिर्यादीनुसार आकाश डाके, किरण सोमनाथ मातंग, प्रथमेश गणेश चौरे, गौरव जगधने, गणेश भगवान कऱ्हाडे, सागर भाऊसाहेब डाके, बाळासाहेब नाना वाघमारे (सर्व रा. गांधीनगर, बोल्हेगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.