कोपरगाव : तालुक्यातील भोजडे व कोळगावथडी या दोन गावात शुक्रवारी वीज पडल्याच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये दोन शेतकरी जखमी झाले तर एक महिला बालंबाल बचावली आहे.शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरणानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तालुक्याच्या ग्रामीण भागात तुरळक पावसाला सुरूवात झाली. याचवेळी वारी शिवारात रंगनाथ सांगळे यांच्या शेतामध्ये कांद्याची लागवड सुरू होती. पाऊस आल्याने लिंबाच्या झाडाखाली आश्रयास थांबलेल्या मारूती जेऊघाले (वय ५५) व रावसाहेब धट (वय ४३) यांच्या अंगावर विज पडून ते जखमी झाले. त्यांच्या शरिराचा ३० टक्के भाग भाजला. जखमींना वारीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन उपचार करण्यात आले. घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. दरम्यान दुपारी दोन वाजता कोळगावथडी येथे रंगनाथ परसराम देवकर यांच्या घरावर विज पडून पंखा, टिव्ही, विद्युत मोटार, विजेच्या तारा, बल्ब आदींसह संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. घरात एकट्या असलेल्या अरूणा देवकर यांनी प्रसंगावधान राखल्याने त्या बालंबाल बचावल्या. तसेच शेजारील सोपान शामराव आढाव यांच्या घराच्या लोखंडी प्रवेशद्वाराला विज चाटून गेल्याने ठिणग्या पडल्या. घटनेची माहिती समजताच विलास आढाव, शांताराम उगले, बाबासाहेब लुटे, अंबादास कवडे, सागर आढाव, विठ्ठल लुटे यांनी मदतकार्य केले.
वीज पडून दोन शेतकरी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 18:52 IST