अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सभासदांना रूपे किसान क्रेडिट कार्ड वितरित केले असून, या कार्डद्वारे येत्या एप्रिलपासून व्यवहार सुरू केले जाणार आहेत. त्यामुळे विविध शासकीय योजनांचा लाभ आता थेट शेतकऱ्यांना मिळणार आहे.
केंद्र सरकारच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत किसान क्रेडिट कार्ड ही योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा बँकेने ३ लाख ४० हजार सभासदांना यापूर्वीच रूपे किसान क्रेडिट कार्डचे वाटप केलेले आहे. पुढील आर्थिक वर्षात या कार्डद्वारेच व्यवहार केले जाणार आहेत. तशा नाबार्डच्या सूचना आहेत. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नियोजन केले आहे. बँकेने सर्व शाखांसाठी ३०० मिनी एटीएम कार्ड खरेदी केले आहेत. हे एटीएम बँकेच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध केले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बँकेच्या शाखेत या कार्डचा वापर करता येणार आहे. तसेच काही अडचणी आल्यास त्या शाखेत सोडविल्या जातील. जिल्हा बँकेकडून विकास सेवा सोसायटीमार्फत शेतकऱ्यांना पीक कर्जासह इतर कर्जाचे वाटप केले जाते. हे कर्ज मंजूर झाल्यानंतर रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. ही रक्कम बँकेत रोख स्वरूपात न काढता कार्डद्वारे व ऑनलाइन व्यवहार होणे अपेक्षित आहे. कार्डचा वापर केल्यास शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनेचा लाभ थेट मिळणार आहे.
....
ऑनलाइन सुविधेवर भर
शेतकऱ्यांना रूपे किसान क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार करणे बंधनकारक करण्यात आले असून, त्यासाठी ऑनलाइन सुविधा बँकेकडून उपलब्ध केली जाणार आहे. बँकेच्या शाखा ग्रामीण भागात आहेत. बँकेचे सर्व्हर डाऊन होणे, बॅटरी बँकअप नसणे, यासारख्या अडचणी आहेत. या अडचणींबाबत व्यवस्थापनाला निर्णय घ्यावा लागणार असून, त्यानंतर ऑनलाइन व्यवहाराला गती मिळणार आहे.
....