नेवासाफाटा : नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथील झंकार मित्र मंडळाने नवरात्रौत्सवात अवास्तव खर्चाला फाटा देऊन गावातील रायीरंद (बहूरुपी) समाजातील एका गरीब कुटुंबातील मुलीचा विवाह ठाकरवण (ता. माजलगाव, जि.बीड) येथील युवकाशी करुन दिला. बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही जोडपी विवाह बंधनात अडकली. मंडळाच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची परिसरात चर्चा आहे. माळीचिंचोरे येथील बहुरूपी समाजातील मोहन चव्हाण यांची मुलगी मनिषा व ठाकरवण येथील अंबादास खरात यांचा मुलगा आकाश यांना आयुष्यभरासाठी एकत्र आणण्यासाठी माळीचिंचोरे येथील झंकार मित्र मंडळाने पुढाकार घेतला. व नवरात्रौत्सवातील अनाठायी खर्चाला फाटा देत या दाम्पत्यांना विवाह बंधनात गुंफून त्यांना संसारोपयोगी वस्तू व कन्यादान साहित्य दिले. आपणही समाजाचे देणे लागतो ही भावना ठेवून समाजात आदर्श निर्माण केला.झंकार मित्र मंडळाचे पुरुषोत्तम चिंधे, संतोष पुंड, सचिन गाडे, संतोष चिंधे, नितीन आहेर, अनिल गायकवाड या कार्यकर्त्यांनी दोन कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी अर्थिक मदत उभी करुन त्यांचा विवाह घडवून आणला. मुलीच्या घरची आर्थिक स्थिती नाजूक आहे. आई, वडील वृद्ध असून त्यांना कोणाचाही आधार नाही. (वार्ताहर)
‘ते’ अडकले विवाह बंधनात
By admin | Updated: October 7, 2016 00:49 IST