निघोज : महाराष्ट्रातील प्रत्येक गावात वाचनक्रांती आणि वृक्षक्रांती होणे फार गरजेचे आहे. वाचनक्रांतीतून तरुण पिढी विकसित होणार असून, तीच खरी उद्याच्या भारत देशाची ताकद असणार आहे. तरुणांनी समोर येऊन विविध समाजोपयोगी कामात सक्रिय राहून एक आदर्शवत काम केले पाहिजे, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.
चोंभूत (ता. पारनेर) येथे परिवर्तन मियावाकी उद्यान वृक्षारोपणच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. गावाने मियावाकी उद्यान बनविण्याचा संकल्प केला असून, यात मोठ्या प्रमाणात तरुणांचा व ग्रामस्थांचा सहभाग आहे. या उद्यानात विविध फळझाडे व जंगली झाडे, अशी ५०० प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, डॉ. भास्कर शिरोळे, पारनेर परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन भालेकर, शिवबा संघटनेचे अनिल शेटे, भालचंद्र दिवटे, बायफ संस्थेचे एस. पाटील, सुभाष रनमोडे, गणेश शेवाळे, गेनभाऊ माळी, स्वप्नील आंबेटकर, दत्तात्रय कोल्हे, भाऊ मेहेर, विठ्ठल पारखे, खंडू खांडेकर, रामदास पारखे उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मण घोलप यांनी केले. प्रास्ताविक प्रशांत नरवडे यांनी केले. प्रणल भालेराव यांनी आभार मानले.
----
२३ चोंभूत
चोंभूत येथे वृक्षारोपण करताना पद्मश्री पोपटराव पवार, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप व इतर.